कोलकाता : आयपीएलचा ४४ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. पंजाबने पूर्ण २० षटके फलंदाजी करताना कोलकातासमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले.पण कोलकाता या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाचा अडथळा आला.त्यामुळे अखेर रात्री ११ वाजताच्या सुमारास हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण देण्यात आला आहे. यामुळे पाँइंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत.
कोलकाता – पंजाब हा सामना रद्द झाल्याने मुंबई इंडियन्स ५ क्रमांकावर घसरले आहेत. कारण पंजाब किंग्सचे आता ९ सामन्यांत ११ गुण झाले असल्याने ते आता चौथ्य क्रमांकावर आहेत. १० गुणांवर असलेला मुंबई इंडियन्स संघ चौथ्या स्थानावरून पाचव्यावर घसरले आहेत.पाँइंट्स टेबलमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तिन्ही संघांचे १२ गुण आहेत. पण नेट रन रेटमुळे स्थान निश्चित होत आहे. तसेच लखनौ सुपर जायंट्सचेही १० गुण आहेत. पण त्यांचा नेट रन रेट मुंबईपेक्षा कमी असल्याने ते सहाव्या क्रमांकावर आहेत.कोलकाता नाईट रायडर्सलाही १ गुण मिळाल्याने त्यांचे ७ गुण झाले असून ते सातव्या क्रमांकावर आहेत. ६ गुणांसह सनरायझर्स हैदराबाद ८ व्या क्रमांकावर आहेत. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ ४ गुणांसह तळातील अनुक्रमे ९ व्या आणि १० व्या स्थानावर आहेत.
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानंतर पंजाबकडून सलामीवीर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी १२० धावांची सलामी भागीदारी केली. प्रियांश आर्यने ३५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली. तसेच प्रभसिमरनने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ८३ धावांची खेळी केली.हे दोघे बाद झाल्यानंतर मॅक्सवेल ७ धावांवर आणि यान्सिन ३ धावांवर बाद झाले. पण नंतर श्रेयसने १६ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या, तर इंग्लिसने नाबाद ११ धावा केल्या. कोलकाताकडून वैभव अरोराने २ विकेट्स घेतल्या, तसेच वरूण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.त्यानंतर कोलकाता संघाकडून रेहमनुल्ला गुरबाज आणि सुनील नरेन हे सलामीला उतरले होते. पण १ षटकात ७ धावा झाल्या. त्यानंतर पावसामुळे सामना थांबला.