लासलगाव : सध्या कांद्याला जो भाव मिळतोय तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढा सुद्धा भाव मिळत नाही. कांदा निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे बाजार भाव पडले. ही सरकारची जबाबदारी आहे. अर्थात सरकारला योग्य वेळी पाऊले उचलणे आवश्यक होते, अशी खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी लासलगाव येथे केली कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजु शेट्टी हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असतांना सोमवारी त्यांनी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकार्यासोबत लासलगाव बाजार समितीला भेट देऊन कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी बांधवाशी संवाद साधुन घसरत्यात कांद्याच्या भावा संदर्भात चर्चा केली.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लासलगाव बाजार समिती,व्यापारी, शेतकरी बांधव यांच्या वतीने माजी खा राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने निर्यात शुल्क आधीच हटवले असते व कांदा निर्यातीला थोडसं प्रोत्साहन दिल असत तर निश्चितच कांद्याचे बाजार भाव दोन हजार रुपयांच्या पुढे गेले असते. मात्र, हे सरकारला हे माहिती होतं कारण कांद्याचे उत्पादन अचानक वाढलेले नाही. दोन-तीन महिन्यापूर्वीच अंदाज झालेला होता की यावर्षी मध्य प्रदेश व महाराष्ट्रामध्ये कांद्याचे उत्पादन वाढतंय.बाजारपेठ हे भावनेवर चालत नाही तर मागणी पुरवठ्यावर चालत असते आणि मग आपल्या गरजेपेक्षा कांद्याचा पुरवठा जास्त होतो म्हटल्यानंतर त्याची पर्यायी व्यवस्था करणे हे सरकारचं काम आहे. सरकारकडे सगळा डाटा उपलब्ध असतो ते सरकारनं न केल्यामुळे आज शेतकऱ्यांना हा तोटा सोसावा लागत असल्याचा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला. तसेच नाशवंत शेतमालासाठी हमीभाव कायदा मी सरकारच्या मानगुटीवर बसून मंजूर करून घेणार असल्याचा निर्धार शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.
नाफेडमार्फत होणाऱ्या खरेदीवर आमचा भरवसा नसल्याचेही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. नाफेडच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत.बोगस प्रोड्यूसर कंपन्या काढायच्या व त्यांच्या मार्फत कांदा खरेदी करायचा व तो पुन्हा अशा वेळी मार्केटमध्ये विकायचा की पुन्हा बाजार भावात घसरण झाली पाहिजे.नाफेडने योग्य अश्या सहकारी संस्थांमार्फत प्रत्यक्ष बाजार समितीत उतरून कांदा खरेदी करावा जेणेकरून स्पर्धा निर्माण होऊन कांद्याचे बाजार भाव वाढतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली तसेच लवकरच आम्ही दिल्लीच्या नाफेडच्या कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला.