मुंबई/नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय प्रक्रियांना वेग आला असून राज्य सरकारने आज, मंगळवारी महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अ, ब आणि क वर्क महापालिकांची प्रभागरचना होणार असून यात पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे.
राज्यात सुमारे ४ वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले आहेत. राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये २२७ एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे. तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छ. संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये ४ सदस्यांचे प्रभाग असणार आहेत.
मुंबईमध्ये आधी २२७ प्रभाग होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन २३६ प्रभाग करण्यात आले. पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर २२७ प्रभाग करण्यात आले. त्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयात देण्यात आले होते. पण ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये २२७ प्रभाग असणार आहेत. राज्यातील नागपूर आणि पुणे अ-वर्ग महापालिका असून ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड या ब-वर्ग महापालिका आहेत. तर नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि छत्रपती संभाजीनगर क-वर्गात मोडतात. तसेच ड-वर्ग महापालिकांमध्ये ४ सदस्यिय प्रभाग असतील. ड-वर्गातील महापालिकेत प्रभाग रचना ठरवताना शक्यतोवर सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत. मात्र, सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा ५ सदस्यांचा होईल किंवा २ प्रभाग ३ सदस्यांचे होतील. ड वर्ग महापालिकांमध्ये अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकेचा समावेश आहे.
नाशिकची महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ४ सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय राज्याच्या नगर विकास विभागाने घेतला आहे त्याबाबतचा आदेश हा मंगळवारी उशिरा प्रकाशित करण्यात आलेला आहे मंगळवारी रात्री उशिरा राज्य सरकारच्या नगर रचना विभागाने प्रकाशित केलेल्या अध्यादेशानुसार नाशिक मध्ये चार सदस्य प्रभाग रचना होणार आहे त्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीप्रमाणे कामकाज करावयाचे आहे हे आदेशामध्ये नगर विकास विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे हो घडलेला महारपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून होऊ राज्य सरकारने उचललेले अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे