कोल्हापूर : वर्ष २०१४ च्या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी घुसखोरांचीच मतपेढी बनवली होती; मात्र पश्चिम बंगालच्या विजयाच्या निमित्ताने मी सगळ्या देशाला सांगू इच्छितो की हा देश धर्मशाळा नाही. या देशातील एक अन् एक घुसखोराला शोधून काढू आणि या देशात एकाही घुसखोराला राहू देणार नाही. भारताची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची असून या देशात ज्यांना जन्म झाला आहे त्यांनाच या देशात रहाण्याचा अधिकार आहे, असे ठाम प्रतिपादन देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. याआधी आम्ही ‘शिंदे गट’ असे म्हणत होतो. आता शिंदे गट वगैरे काही राहिले नाही. आता शिंदे यांच्याकडे आहे तीच शिवसेना झाली असल्याचेही ते म्हणाले. ते पोलीस परेड मैदानावर ‘भव्य कृतज्ञता सोहळ्या’च्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत बोलत होते. या प्रसंगी विविध मंत्री, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, तसेच कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढे म्हणाले, ‘‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिराची विकासकामे पूर्ण झाल्यावर त्यातून भक्तीचे पुनर्जागरण होईल. त्यामुळे ५ मासाच्या आत ही कामे पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथचा कॉरिडॉर, केदारनाथ-बद्रीनाथ यांचा विकास भाजप सरकारने केला आहे. श्री महालक्ष्मीदेवीचा विकास आराखड्याच्या कामात पुढाकार घेऊन महाराष्ट्रात धर्माचे शासन असून ते संस्कृतीचे आदर करते हे दाखवून दिले आहे. गेल्या १२ वर्षांत या देशात भाषा, संस्कृती यांचे पुनरुत्थान, तसेच सीमेचे संरक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात काम झाले आहे. इतकेच नाही, तर चंद्रावर यान पाठवण्याचे महत्त्वाचे कार्यही मोदी शासनाने केले आहे.’’
राज्यातील ५ जोतिर्लिगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाचा विकास चालू ! – मुख्यमंत्री
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्ती पुनर्जीवित होत आहे. राज्यातील ५ जोतिर्लिगांसह कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबाचाही विकास चालू आहे. भाविकांसाठी या आराखड्यातून पुढील १०० वर्षांत सेवा करता येईल असे व्यापक काम राज्य शासनाने हाती घेतले आहे. पंढरपूर ‘कॉरॉडॉर’चे काम याच वर्षी आम्ही चालू करत आहोत. श्री क्षेत्र भीमाशंकर येथील विकासकामांना गावकर्यांचा मोठा पाठिंबा मिळत असून गावकर्यांनी अख्खे गाव दीड किलोमीटर स्थलांतर करण्यास अनुमती दर्शवली आहे.’’
सहकार क्षेत्रात अनेक लोकाभिमुख बदल अमित शहा यांनी घडवले – उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राने संपूर्ण देशाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी ओळख दिली आहे. अमित शहा हे अतिशय कणखर गृहमंत्री असून देशातील नक्षलवाद संपवण्याचे काम केंद्रीय गृहमंत्र्यालयाद्वारे पूर्ण झाले. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात अनेक लोकाभिमुख बदल अमित शहा यांनी घडवले आहेत.’’