पदं, जबाबदाऱ्या, संधी तरीही पक्षांतर; आदित्य ठाकरेंची अहिरांवर सडकून टीका

0

योग्य ती कारवाई झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही
मुंबई : सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी अहिर यांच्यावर जोरदार टीका केली. सचिन अहिरांना आम्ही काय कमी केलं, असा सवाल उपस्थित करत त्यांनी अहिरांच्या कुटुंबीयांनाही विविध पदांवर संधी दिल्याचा उल्लेख केला. अहिरांच्या भावाला मुंबई महापालिकेत जबाबदारी, मुलीला प्रभाग समितीत संधी आणि स्वतः सचिन अहिर यांना बेस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, असे सांगत रोज भेटत होतो, आता काय रोज त्यांच्या सारख्यांची आरती करायची का, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांनी पुढे सांगितले की, जवळचे आणि सर्वाधिक संधी मिळालेलीच माणसं पक्ष सोडून जातात. मात्र अशा जाण्याने कोणताही धक्का बसत नाही. वरळी आणि शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तेथील विकासकामेच जनतेसमोर बोलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच वरळीतून सचिन अहिर उमेदवार असले तरी त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. पक्ष सोडून गेलेल्या आणि मंदिरे लुटणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय कसा घेतला, असा सवालही त्यांनी अहिर यांना केला. याशिवाय हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप करत त्यांनी या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केले.

सचिन अहिर यांची उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आली, मात्र भाजपच्या कार्यकर्त्याला ही संधी का देण्यात आली नाही, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. “उपरे लोकांना पदे दिली जात आहेत, पण अनेक वर्षे घरदार सोडून पक्षासाठी काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना न्याय का मिळत नाही?” अशी टीकाही त्यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही ज्यांना शब्द दिला, त्यांच्याशी केलेली बांधिलकी कायम ठेवली. मात्र निष्ठा आणि दिलेल्या वचनांचे पालन करायचे की नाही, हा निर्णय तुमचा आहे. तुम्ही तुमच्या वचनाला जागू शकला नाहीत, ही जबाबदारीही तुमचीच आहे.”

याचबरोबर त्यांनी सत्ताकारणावरही भाष्य केले. “एखादा मराठी नेता पंतप्रधानपदाच्या दिशेने जाऊ लागला की त्याचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू होतो. जसे शिवराजसिंह चौहान यांच्या बाबतीत झाले, तसेच आता देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही घडताना दिसत आहे,” असा दावा त्यांनी केला. संविधानाच्या माध्यमातून मिळालेले अधिकार कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. “लोकांना संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या या टीकेला सचिन अहिर यांनीही प्रत्युत्तर दिले. विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज भरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझा अनुभव काहीसा वेगळा आहे, असे सांगत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत एकनाथ शिंदे काम करत असल्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे आकर्षित होत असल्याचा दावा त्यांनी केला. सार्वजनिकरित्या अनेकजण बोलत नसले तरी खासगीत याबाबत वेगळी भावना व्यक्त करतात, असेही ते म्हणाले.

सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून जबाबदारी देणाऱ्या नेतृत्वासोबत काम करण्याची संधी मिळत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या कामातून ते सिद्ध केल्याचा दावा केला. तसेच आयुष्यात एक दगडही उचलला नाही, असे काही लोक आज आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला लगावत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. दोन्ही नेत्यांच्या या परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech