नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी त्यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील लष्कराच्या कामगिरीचा आढावा घेत नव्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या. जनरल द्विवेदी म्हणाले की, गेल्या २ वर्षांत भारतीय लष्कराने प्रत्येक आघाडीवर सज्जता, संतुलन आणि सतर्कता कायम ठेवली. ऑपरेशन सिंदूर हे या तयारीचे महत्त्वपूर्ण उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उत्तर सीमेवरील ऑपरेशन स्नो लेपर्ड अंतर्गत भारतीय लष्कराची तैनाती पूर्ण ताकदीने आणि उच्च सतर्कतेसह करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पश्चिम सीमेवरही सैन्याने संयम आणि जबाबदारीने आपली भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रत्येक प्रकरणात भारतीय लष्कराने स्पष्ट उद्दिष्ट, शिस्त आणि जबाबदारीच्या भावनेने कर्तव्य बजावले असून, या काळात भूदल, नौदल आणि वायुदल यांच्यातील समन्वय अधिक बळकट झाल्याचे त्यांनी सांगितले. तिन्ही दलांनी समान दृष्टिकोन, परस्पर विश्वास आणि उत्कृष्ट समन्वयाने कार्य केले, असेही ते म्हणाले.वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थिती सध्या स्थिर असली तरी संवेदनशील असल्याचे सांगत जनरल द्विवेदी यांनी भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाला किंवा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी त्यांनी आपले उत्तराधिकारी जनरल धीरज सेठ यांच्याकडे पदभार सोपवत त्यांना शुभेच्छा दिल्या. जनरल धीरज सेठ हे अनुभवी सैनिक आणि सक्षम नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर आपल्या गौरवशाली परंपरा कायम ठेवत नवी उंची गाठेल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे जनरल द्विवेदी म्हणाले. जनरल धीरज सेठ यांनी मंगळवारीच भारतीय लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ते भारताचे ३१ वे लष्करप्रमुख ठरले आहेत. सुमारे चार दशकांचा सैनिकी अनुभव असलेल्या जनरल सेठ यांनी डिसेंबर १९८६ मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश केला होता.