विधानसभेत जितेंद्र आव्हाडांचा स्फोटक गौप्यस्फोट……!”
सरकारसमोर संरक्षणाचे नवे आव्हान
(अनंत नलावडे)
मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात बुधवारी एकच खळबळ उडाली, जेव्हा विधानसभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी तब्बल २५० कोटी रुपयांची जुळवाजुळव सुरू असल्याचा स्फोटक आरोप केला. गुटखा, ड्रग्ज, बनावट औषधे आणि भेसळखोरांच्या साम्राज्यावर धडक कारवाई करणाऱ्या मुंढे यांना हटवण्यासाठी मोठी लॉबी सक्रिय झाल्याचा दावा होताच सभागृहात प्रचंड खळबळ उडाली.
राज्यातील अनेक प्रभावशाली हितसंबंधांना हादरे देणाऱ्या FDAच्या कारवायांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता आता थेट विधानसभेच्या पटलावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.त्यामुळे आगामी काळात हा वाद केवळ एका अधिकाऱ्याच्या बदलीपुरता मर्यादित न राहता “सरकार विरुद्ध माफिया” अशा स्वरूपाचा राजकीय मुद्दा बनण्याचीही चिन्हे आहेत.
“FDA” च्या धाडसत्राने हादरले ‘कोट्यवधींचे साम्राज्य’……!
तुकाराम मुंढे यांनी FDAची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त दूध, बनावट औषधे, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि ड्रग्ज नेटवर्कविरोधात धडक मोहीम उघडली.अनेक ठिकाणी कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त झाला. त्यामुळे वर्षानुवर्षे राजकीय आश्रय आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर फोफावलेल्या रॅकेट्सना पहिल्यांदाच थेट धक्का बसल्याचीही चर्चा प्रशासनात सुरू आहे.
याच कारवायांमुळे काही प्रभावशाली गटांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून मुंढे यांना पदावरून हटवण्यासाठी पडद्यामागे हालचालीही सुरू असल्याची चर्चा आधीपासूनच होती.आव्हाड यांच्या आरोपांमुळे या चर्चांना आता राजकीय वैधता मिळाल्याचे मानले जात आहे.
सभागृहात बोलताना आव्हाड यांनी थेट आरोप केला की, औषध कंपन्या, ड्रग्ज माफिया आणि भेसळखोरांचे जाळे मुंढे यांच्या विरोधात एकत्र आले आहे.त्यांच्या बदलीसाठी तब्बल २५० कोटी रुपयांची आर्थिक ताकद वापरली जात असल्याचा दावाही त्यांनी केला.इतकेच नव्हे तर, “मुंढेंच्या जीविताचीही काळजी घ्या. त्यांनी अनेकांच्या आर्थिक हितसंबंधांवर घाव घातला आहे,” असे सांगत त्यांनी सरकारला सावधतेचा इशाराही दिला.
“पाकिटांचे कार्यालय” कोणाचे…..?
आव्हाड यांनी सभागृहात “पाकिटांचे कार्यालय” असा उल्लेख करत काही शक्तिशाली घटकांकडे अप्रत्यक्ष बोट दाखवले.तसेच राज्यातील गुटखा माफियांचे मोठे जाळे आणि त्यामागील आर्थिक व्यवहार लवकरच पुराव्यानिशी उघड करणार असल्याचे सांगून आणखी मोठ्या राजकीय वादळाचेही अप्रत्यक्षपणे संकेत दिले.त्यामुळे आगामी काळात गुटखा, भेसळ आणि ड्रग्जविरोधातील कारवाईसोबतच या कथित आर्थिक साखळीचा मुद्दाही ऐरणीवर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
सरकारसाठीही प्रतिष्ठेची लढाई…….!
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने भ्रष्टाचार,भेसळ, ड्रग्ज आणि संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका घेतल्याचा दावा सातत्याने केला आहे. अशावेळी FDAच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या अधिकाऱ्याबाबत विधानसभेतच असा गंभीर आरोप झाल्याने सरकारची भूमिका काय राहते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मात्र त्याचवेळी मुंढे यांना अधिक बळ देत सरकार कारवाईची व्याप्ती वाढवणार की दबावगटांच्या आरोप-प्रत्यारोपांत हा विषय विरघळणार, यावर विरोधकांकडूनही बारकाईने नजर ठेवली जात आहे. कारण ही
“लढाई आता एका अधिकाऱ्याची नाही…”
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा संघर्ष आता केवळ तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा राहिलेला नाही. तो “भेसळखोर आणि ड्रग्ज माफिया विरुद्ध कठोर प्रशासन” असा बनत चालला आहे.विधानसभेत घुमलेल्या “२५० कोटींच्या सुपारी” च्या आरोपाने राज्यातील सत्ताकारण, माफिया नेटवर्क आणि प्रशासनातील संघर्ष पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आणला आहे.