पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ २० जुलैला सीजेपीचा संसदेवर मोर्चा

0

नवी दिल्ली : परीक्षा प्रश्नपत्रिका लीक प्रकरणांवरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)ने २० जुलै रोजी जंतर-मंतर ते संसद भवन असा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. पक्षप्रमुख अभिजीत दीपके यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी समर्थकांना जंतर-मंतर येथे पोहोचण्याचे आवाहन केले असून, आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण ठेवण्याचे आवाहन केले आहे.

अभिजीत दीपके यांनी रविवारी समाजमाध्यम मंच ‘एक्स’वर संदेश जारी करताना सांगितले की, सर्व समर्थकांनी लोकशाही पद्धतीने आपला आवाज उठवावा आणि कोणत्याही प्रकारची अव्यवस्था, गोंधळ किंवा चिथावणीखोर प्रकारांपासून दूर राहावे. पक्षाचे आंदोलन आणि संसद मार्च हा पूर्णपणे शांततापूर्ण पद्धतीने पार पडेल, असे त्यांनी स्पष्ट केले. दीपके म्हणाले की, “मी सर्व समर्थकांना जंतर-मंतर येथे येण्याचे आवाहन करतो. आमचे आंदोलन आणि मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण असेल. जर कोणी व्यक्ती कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण करत असेल किंवा नकारात्मक घोषणा देत असेल, तर तो ना सोनम सर (सोनम वांगचुक) यांचा समर्थक आहे, ना सीजेपीचा समर्थक आहे.”

दरम्यान, पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेल्या २० दिवसांपासून जंतर-मंतर येथे उपोषण करत होते. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर या आंदोलनाशी संबंधित राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच काळात दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या समाजमाध्यम मोहिमेशी तसेच प्रस्तावित आंदोलनाशी संबंधित काही प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे. राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, परिस्थितीवर पोलिसांकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

सीजेपीच्या नेतृत्वाखाली जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा मुख्य उद्देश परीक्षा प्रश्नपत्रिका लीक प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, वारंवार होणाऱ्या परीक्षा अनियमिततेमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम झाला असून, या प्रकरणात सरकारने जबाबदारी निश्चित करण्यात अपयश आले आहे. २० जुलै रोजी होणारा संसद मार्च लोकशाही मार्गाने आणि शांततापूर्ण पद्धतीने आयोजित केला जाणार असल्याचे सीजेपीने सांगितले आहे. तसेच सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech