‘स्वरसम्राज्ञी’ अनंतात विलीन

0

मुंबई : भारतीय संगीतविश्वातील अजरामर नाव आणि स्वरांची जादू निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन झाल्या असून मुंबईतील शिवाजी पार्क येथील कै.भागोजी कीर हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून पाठविण्यात आलेले पुष्पचक्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आशा भोसले यांच्या पार्थिवावर अर्पण केले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली असून संगीत क्षेत्रासोबतच महाराष्ट्रावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अंत्यसंस्कारावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, मनसे प्रमुख राज ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय शिरसाट, तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सिनेक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी उपस्थितांनी “आशाताई आपल्या गाण्यांमधून कायम जिवंत राहतील” अशा भावना व्यक्त केल्या.

आशाताईंच्या पार्थिवाला त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी मुखाग्नी दिला. या वेळी कुटुंबियांचा आक्रोश पाहून वातावरण अतिशय भावनिक झाले होते. नात जनाई यांना अश्रू अनावर झाले होते, तर आनंद भोसलेही आईच्या आठवणीने ढसाढसा रडताना दिसले. उपस्थित गायकांनी गाणी गात त्यांना अखेरचा निरोप दिला. या वेळी सिनेविश्वातील अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित होते. आमिर खान, विकी कौशल, विवेक ओबेरॉय आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी आशाताईंच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मराठी अभिनेते अभिजीत केळकर यांनाही या प्रसंगी अश्रू अनावर झाले होते.

अंत्यसंस्कारापूर्वी लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी आशाताईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. हजारो चाहत्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. अंत्ययात्रेदरम्यानही मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आणि आपल्या लाडक्या गायिकेला निरोप दिला. आशा भोसले यांना अलौकिक स्वरांची देणगी लाभली होती. त्यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत १२ हजारांहून अधिक गाणी विविध भाषांमध्ये गायली. मराठी, हिंदी, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही त्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी होत होत्या आणि त्यांच्या खणखणीत आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करत होत्या.

मात्र काही दिवसांपासून त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या. शनिवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने ब्रीच कॅण्डी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे निधन झाले. आशाताई आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या हजारो अजरामर गाण्यांच्या रूपात त्या कायम जिवंत राहतील, अशी भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय सिनेमा आणि संगीतविश्वात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech