एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने ज्ञानाचे डिजिटायझेशन करून देशभरातील ग्रंथालये व संशोधन संस्थांशी जोडावे
मुंबई : भारतीय ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने पुढाकार घ्यावा. संस्थेकडील ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करून तो देशभरातील विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. टाउन हॉल येथे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या नवनिर्वाचित समितीच्या परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आमदार अमित साटम, प्रवीण दरेकर, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, सचिव विवेक गणपुले आदी उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध उद्योजक रमेश दंडवते यांनी एशियाटिकच्या बळकटीकरणासाठी ५० लाख रुपयांची मदत केली, याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, राष्ट्राची स्मृती, इतिहास, संस्कार, भाषा, अभिलेख आणि परंपरांचे जतन महत्त्वाचे आहे. इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांचे संरक्षण करणाऱ्या राष्ट्राची अस्मिता कधीही नष्ट होत नाही. भारतीय ज्ञानपरंपरा अनेक आव्हानांनंतरही टिकून राहिली आहे. ज्ञान कोणत्याही चौकटीत बंदिस्त न राहता मुक्त असले पाहिजे. या ज्ञानाचा उपयोग देशासह संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी व्हावा. भारतीय इतिहास, पुरातत्त्व, भाषा, तत्त्वज्ञान, साहित्य आणि विज्ञानाचे पुनर्मूल्यांकन भारतीय दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे. सोसायटीने महाराष्ट्रातील विद्यार्थी व संशोधकांना संग्रहाच्या अभ्यासासाठी प्रोत्साहन द्यावे, ज्ञानसंग्रहाचे डिजिटायझेशन करावे आणि देशातील ग्रंथालये व संशोधन संस्थांना सामायिक व्यासपीठावर जोडावे. तसेच ‘ज्ञान भारत राष्ट्रीय पांडुलिपी मिशन’मध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावागावांत आणि विद्वानांच्या घरांमध्ये जतन केलेल्या दुर्मीळ पांडुलिपींचा शोध, संकलन, संवर्धन व संशोधनासाठी विशेष अभियान राबवावे, असे आवाहनही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.
‘गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई येथे ‘गणेश ज्ञानारती’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रदर्शनाची पाहणी करून ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेव्यांची माहिती जाणून घेतली. प्रदर्शनात मौर्य, सातवाहन, गुप्त आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुमारे १३०० दुर्मिळ सुवर्ण, रजत, कांस्य व तांब्याची ऐतिहासिक नाणी येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षापात्राचा अंश, बुद्ध प्रतिमा व बोधिसत्त्वाचे अवशेषही मांडण्यात आले आहेत. मुघलकालीन हिंदुस्तानाचा १७८८ मधील नकाशा आणि नर्मदा नदीचा १८७० मधील नकाशाही प्रदर्शनाचे आकर्षण आहे. भारतीय राजे व जमीनदारांचा शाही दरबार अल्बमसह अनेक दुर्मिळ ऐतिहासिक ग्रंथ येथे ठेवण्यात आले होते. कोल्हापूर व कान्हेरी येथील पुरातत्त्वीय उत्खननातील वस्तू तसेच बुद्ध प्रतिमा यांच्यासह भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वीय वारशाचे समृद्ध दर्शन घडविणारे असे हे प्रदर्शन होते.