कारगिल विजय दिन राष्ट्रीय संकल्पाचे प्रतीक – डॉ. जितेंद्र सिंह

0

भारताची फाळणी ही इतिहासातील सर्वात मोठी चूक
नवी दिल्ली : कारगिल विजय दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नसून राष्ट्रीय संकल्पाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन करत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, हा विजय भारतीय सशस्त्र दलांच्या दुर्दम्य शौर्याचा तसेच भारताची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडत्वाचे रक्षण करण्याच्या देशाच्या अढळ वचनबद्धतेचा गौरवशाली पुरावा आहे. कारगिलपासून मिळालेले धडे आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण देशासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी निरंतर सतर्कता आणि राष्ट्रीय एकतेची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. नवी दिल्ली येथील काश्मिरी कल्चरल सेंटरमध्ये ‘मीरापूर बलिदान भवन समिती’ची संस्था असलेल्या ‘PoJK युथ फोरम’च्या सहकार्याने ‘जम्मू कश्मीर पीपल्स फोरम’ने 27 व्या कारगिल विजय दिनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह बोलत होते.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भारताच्या फाळणीचे वर्णन “इतिहासातील सर्वात मोठी चूक” असे केले. तसेच पाकव्याप्त जम्मू आणि कश्मीर (PoJK) परत मिळवणे हाच भारत आणि पाकिस्तानमधील एकमेव प्रलंबित विषय असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या सुरक्षेचे चित्र पूर्णपणे बदलले आहे, असा उल्लेख त्यांनी केला. परकीय आक्रमणाला उत्तर देताना भारताची भूमिका आता केवळ प्रतिक्रिया देण्यापुरती मर्यादित नसून, ती दृढ निश्चय, पूर्ण तयारी आणि निर्णायक कारवाईची झाली आहे, असे ते म्हणाले. संरक्षण उत्पादनातील वाढत्या स्वावलंबना (आत्मनिर्भरते) मुळे देशाची राष्ट्रीय सुरक्षा अधिक बळकट झाली आहे, असेही डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारताने गेल्या दशकात आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनात पूर्णपणे बदल केला आहे. सरकारने दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ (अर्थात शून्य सहिष्णुतेचे) धोरण स्वीकारले आहे. सीमा व्यवस्थापन मजबूत केले आहे. तसेच परकीय आक्रमणाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी जुने धोरण बदलून आक्रमक आणि ठोस रणनीती लागू केली आहे. या बदलामुळे राष्ट्रीय आत्मविश्वास वाढला असून भारताचे प्रादेशिक अखंडत्व जपण्याची क्षमता अधिक मजबूत झाली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech