कणकवली : उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक प्रकरणातून मंत्री नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र ५०४ गुन्ह्याखाली त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. त्यांना एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सोबतच एक लाख रुपये दंड भरण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान नितेश राणे यांच्या वकिलांनी आता समोर आलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना जुलै २०१९ मध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि दुरावस्थेसाठी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह ४० जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमय झाली होती. त्यावेळी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखलफेक आणि मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर ३५३, ३३२, ५०४, ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यातील अन्य कलमांतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र ५०४ कलमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग प्रकरणी राणे यांना एक महिन्याचा कारावास व एक लाख रूपये दंड सुनावण्यात आला आहे. आरोपींच्या वतीने त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज करण्यात आला आहे. त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.