नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध पौर्णिमेची ही संधी आपल्याला प्रेरणा देते. आपण आपल्या जीवनात शांतता वाढवूया, करुणेचा अंगिकार करुया आणि संतुलनासह पुढे जाऊया. आज जग ज्या प्रकारच्या तणावातून आणि संघर्षातून जात आहे, अशा काळात बुद्धांचे विचार अधिकच महत्त्वाचे झाले आहेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांनी ‘मन की बात’ (१३३ वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले की, काही दिवसांतच आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत. मी तुम्हा सर्व देशवासियांना आधीपासूनच शुभेच्छा देतो. भगवान गौतम बुद्धांचा जीवन संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे. शांततेची सुरुवात आपल्या आतूनच सुरू होते, हे त्यांनी आपल्याला शिकवले आहे; स्वतःवर विजय मिळवणे हाच सर्वात मोठा विजय असतो, हे त्यांनी सांगितले आहे. बौद्ध परंपरा आपल्याला निसर्गासोबत नाते निर्माण करण्याची शिकवण देते. भगवान बुद्धांना ज्ञान एका वृक्षाखालीच मिळाले होते. निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. देशामध्येही असे प्रयत्न होत आहेत.
भारताने विज्ञानाला नेहमीच देशाच्या प्रगतीशी जोडले आहे. याच विचाराने आपले शास्त्रज्ञ ‘नागरी अणू कार्यक्रम’ पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देत आहे. यामुळे आपल्या औद्योगिक विकासाला, ऊर्जा क्षेत्राला आणि आरोग्य क्षेत्राला मोठा लाभ झाला आहे. शेतीपासून ते आधुनिक नवसंशोधकांपर्यंत सर्वांनाच भारताच्या नागरी अणू कार्यकर्माने मोठी मदत केली आहे.
भारताच्या विकासासाठी सौर आणि पवन ऊर्जा आवश्यक आहेत. ही केवळ पर्यावरणाची बाब नाही, तर ही आपल्या भविष्याची सुरक्षा आहे. यामध्ये आपल्या सर्वांची भूमिका आहे. आपल्याला वीज वाचवायची आहे, आपल्याला स्वच्छ ऊर्जा म्हणजेच ‘क्लीन एनर्जी’ चा स्वीकार करायचा आहे. देशामध्ये प्रत्येक स्तरावर असे प्रयत्न होणे गरजेचे आहे, कारण यातूनच मोठा बदल घडून येतो.
आज भारत पवन-ऊर्जा क्षमतेमध्ये जगात चौथ्या स्थानावर आहे. आपल्या अभियंत्यांचे हे कष्ट आहेत, हे आपल्या तरुणांचे परिश्रम आहेत आणि हे देशाच्या सामूहिक इच्छाशक्तीचे प्रतीक आहे. आज पवन-शक्ती भारताच्या विकासाची नवीन गाथा लिहित आहे. भारताने अलीकडेच पवन-ऊर्जा म्हणजेच पवन ऊर्जा मध्ये मोठे यश संपादन केले आहे. आता भारताची पवन-ऊर्जा निर्मिती क्षमता ५६ गिगावॉट पेक्षा अधिक झाली आहे. गेल्या केवळ एका वर्षातच सुमारे ६ गिगावॉट नवीन क्षमतेची भर पडली आहे. पवन-ऊर्जेमध्ये भारत झपाट्याने पुढे जात आहे आणि जगही आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे.