नवी दिल्ली : अन्नपदार्थांच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे देशातील किरकोळ महागाई दर जून महिन्यात उसळी घेऊन ४.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर मे महिन्यात तो ३.९३ टक्के होता. किरकोळ महागाई दरातील या वाढीमागील मुख्य कारण म्हणजे अन्नपदार्थांच्या किमतींमध्ये झालेली वाढ होय. आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित अन्न महागाई जूनमध्ये ५.३२ टक्के राहिली, जी मे महिन्यातील ४.७८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीमुळे मुख्य महागाई दरावर (चलनवाढीवर) दबाव निर्माण झाला आहे.
आकडेवारीनुसार, विशेषतः आले आणि टोमॅटोसारख्या भाज्यांच्या किमतींमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराच्या बजेटवर परिणाम झाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या माहितीनुसार, शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात महागाईचा परिणाम अधिक दिसून आला आहे. जून महिन्यात ग्रामीण भागातील महागाई दर ४.७४ टक्के राहिला, तर शहरी भागात तो ३.९२ टक्के नोंदविण्यात आला. सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) किरकोळ महागाई दर दोन टक्के कमी-जास्त मर्यादेसह चार टक्क्यांच्या पातळीवर राखण्याची जबाबदारी दिली आहे.