पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

0

– २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने बुधवारी एमपीएससीच्या (MPSC) तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक केली आहे. औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांना अटक करण्यात आली आहे. पेपर फुटल्याचा आरोप करणारा गौरव पाटील याचीही भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप गौरव पाटील याला अटक झालेली नाही. याशिवाय, एमपीसीचे सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांच्यासह पेपरफुटीचा सूत्रधार कौटील्य अकादमी, नंदुरबारचे संचालक प्रविण पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. याशिवाय, परीक्षार्थी ऋतुजा पाटील ही देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. तिचे वडील अमृत पाटील यांचाही अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. या सगळ्यांच्या पोलीस चौकशीतून आता पेपरफुटी संदर्भात महत्त्वाची माहिती आणि इतर धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे. या सगळ्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

२२ मार्च, २०२६ रोजी ही चाळणी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यातील ६ विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. सदर परीक्षेचा दिनांक १२ जून २०२६ रोजी निकाल जाहीर करण्यात आला. चाळणी परीक्षेअंती मुलाखतीकरिता ५०६ इतके उमेदवार पात्र ठरले. यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ जुलै ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी मुलाखती संपल्यानंतर औषध निरीक्षक पदाकरिता पात्र ठरणाऱ्या ४८५ व अपात्र ३ अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन या संवर्गाच्या उपरोक्त जाहिरातीतील पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. याकरिता संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही. तसेच त्याकरिता कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. फेरपरीक्षेसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech