नागपूर : लोणावळा–कर्जत दरम्यान झालेल्या भूस्खलनाचा नागपूर आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांवर कोणताही थेट परिणाम झालेला नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. नागपूर किंवा विदर्भातून सुटणाऱ्या तसेच येथे येणाऱ्या प्रमुख गाड्या दुरांतो, विदर्भ एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस आणि शालिमार एक्सप्रेस—यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झालेला नाही.
तथापि, विदर्भाशी संबंधित दोन गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये गाडी क्रमांक १७६१४ हुजूर साहिब नांदेड–पनवेल एक्सप्रेसचा समावेश असून, ही गाडी आता दौंड–मनमाड–इगतपुरी–कल्याण मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच २०९१५ चेरलापल्ली–इंदौर हमसफर एक्सप्रेस ही गाडी देखील दौंड–मनमाड–जळगाव–पालधी–सुरत मार्गे चालवली जात आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नागपूर–मुंबई आणि नागपूर–पुणे मार्गावरील मुख्य गाड्या कसारा–इगतपुरी घाटमार्गे धावत असल्याने, सध्या तरी विदर्भातील प्रवाशांना कोणतीही अडचण भासत नाही. सर्व प्रमुख गाड्या वेळापत्रकानुसार सुरळीत सुरू आहेत.