नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ६ आणि ७ मे च्या रात्री पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळं उध्वस्त केलीत. या कारवाईत सुमारे १०० जिहादी दहशतवादी ठार झाल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देण्यासाठी आज, गुरुवारी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री बोलत होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देताना सांगितले की, या एअर स्ट्राईकमध्ये सुमारे १०० दहशतवादी मारले गेले आहेत. भारताला परिस्थिती आणखी चिघळायची नाही. पण जर पाकिस्तानने काही आगळीक केल्यास भारत शांत बसणार नाही असे राजनाथ म्हणाले. तसेच केवळ एक कारवाई करून ऑपरेशन सिंदूर संपुष्टात आलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगेंनीही बैठकीला हजेरी लावली होती. तत्पूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या कारवाईला आपले समर्थन दिले. तसेच ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर सर्व पक्षीय बैठक बोलावून सर्व विरोधकांना विश्वासात घेतल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले. सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारतर्फे माध्यमांना निवेदन देताना म्हटले की, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सौहार्दपूर्ण पद्धतीने पार पडली. सर्व नेत्यांनी परिपक्वता दाखवत कोणतीही टीका-टिप्पणी केली नाही. ही बैठक एका व्यापक राजकीय हेतून घेतली गेली होती, जिचा उद्देश सफल झाल्याचे रिजिजू यांनी सांगितले.