भाजपा उमेदवाराच्या निवडणूक अर्जात अपूर्ण माहिती असल्याचा केला आरोप, संबंधीत उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची केली मागणी, तर कायद्याने आपल्या पत्नीचा फॉर्म वैध्य असल्याची मनोज राय यांची प्रतिक्रिया
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर काल या अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननी मध्ये कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. १३ (क) मधील भाजपा उमेदवार सरोज मनोज राय. यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे उमेदवार राहुल काटकर यांनी आक्षेप घेतला आहे. सरोज राय यांच्या उमेदवारी अर्जात अपूर्ण माहिती असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने कल्याण पूर्वेतील ड प्रभाग क्षेत्र कार्यालयातील निवडणूक कार्यालयाबाहेर निदर्शने करत ठिय्या मांडण्यात आला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्र. १३ मधून भाजपाच्या वतीने माजी नगरसेवक मनोज राय यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना या अर्जात काही माहितीचे कॉलम रिकामे ठेवण्यात आले आहेत. तर राय यांना तीन आपत्ये असतांना त्यांच्या जन्मतारखेचा उल्लेख केला नसल्याचा आरोप काटकर यांनी केला आहे. निवडणूक अर्जात कोणत्याही माहितीचा कॉलम रिकामा न ठेवणे, अथवा त्याठिकाणी माहिती भरून अथवा निरंक लिहिणे बंधनकारक असल्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचे काँग्रेस उमेदवार राहुल काटकर यांनी सांगितले.
याबाबत काल निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आक्षेप घेऊन देखील त्यांनी हा उमेदवारी अर्ज बाद न करता याबाबत न्यायालयात जाण्याचे सांगितले असल्याचे राहुल काटकर यांनी सांगितले. तर निवडणूक आयोग हा सत्ताधारी भाजपा शिवसेनेच्या संगण्यानुसार काम करत असून इतर उमेदवारांचे फक्त सही नसल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले. तर भाजपा उमेदवाराच्या फॉर्ममध्ये मोठी चूक असतांना देखील त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला असल्याचे शैलेश तिवारी यांनी सांगितले. तर तर याबाबत भाजपा उमेदवार सरोज राय यांचे पती माजी नगरसेवक मनोज राय यांना विचारले असता कायद्याने आपला फॉर्म वैध्य असून ज्यांना तक्रार असेल त्यांनी न्यायालयात दाद मागावी अशी प्रतिक्रिया दिली.