मुंबई : यावर्षीच्या हंगामामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडील बैठकीनंतर मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले. विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम देण्याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते. सदस्य सर्वश्री विजय वडेट्टीवार, विनोद अग्रवाल, नितीन राऊत, भास्कर जाधव, मोहन मते, प्रकाश सोळंके, धनंजय मुंडे, अर्जून खोतकर, दिलीप लांडे आदींनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने २०१३ पासून प्रोत्साहन रक्कम देण्याची सुरूवात झाली आहे. ही योजना राज्यभर लागू असून नोंदणी केलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाते. २०२४-२५ यावर्षी ७ लाख २७ हजार ५४८ नोंदणीकृत शेतकऱ्यांना १६३६ कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम देय होती. यापैकी १५८६ कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले आहेत. पणन हंगाम २०२५-२६ मध्ये एकूण ७ लाख १६ हजार ३३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून २२ फेब्रुवारी २०२६ अखेर ८८ लाख ७४ हजार २७० क्विंटल धानाची किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आली आहे. वर्ष २२-२३ या वर्षी १५ हजार असलेली प्रोत्साहन रक्कम २३-२४ ला २० हजार रुपये इतकी वाढवली गेली आहे. ही रक्कम वाढविण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.