बंगळूर चेंगराचेंगरीतील बळींना अनोखी श्रद्धांजली; चिन्नास्वामी स्टेडियममधील ११ जागा रिकाम्या ठेवल्या जाणार

0

बंगळुरु : सुरू होण्यापूर्वी, बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममधील ११ जागा कायमस्वरूपी रिकाम्या ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाच्या विजेतेपदाच्या जल्लोषादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या ११ जणांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए) आणि आरसीबी यांच्या संयुक्त निर्णयानुसार, एका प्रमुख स्टँडमधील ११ जागा सार्वजनिक विक्रीतून काढून टाकण्यात आल्या आहेत आणि त्या कधीही भरल्या जाणार नाहीत.

४ जून २०२५ रोजी, आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाचा जल्लोष साजरा करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. स्टेडियमबाहेर मोठ्या गर्दीत घडलेली ही घटना क्रीडा इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक बनली आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसह सर्व सामन्यांदरम्यान या जागा रिकाम्या ठेवून, स्टेडियममध्ये एक चिरस्थायी आणि दृश्यमान आठवण निर्माण करण्याचा अधिकाऱ्यांचा उद्देश आहे.

केएससीएचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी राज्य संघटनेच्या या योजनेला दुजोरा दिला. ते म्हणाले, “त्या दिवसाचा विचार करणेही वेदनादायी आहे. त्या ११ लोकांच्या स्मृतीचा सन्मान करणे महत्त्वाचे आहे, असे आम्हा सर्वांना वाटले. आम्हाला कोणतीही वेदना पुन्हा जागृत करायची नाही, तर त्यांचे स्मरण करायचे आहे. म्हणूनच, ज्या क्रिकेट चाहत्यांचे आयुष्य दुर्दैवाने अकाली संपले, त्यांच्या स्मरणार्थ एक स्मारक फलक लावण्याचा आम्ही निर्णय घेतला.”

रिटायर केलेल्या जागांसोबतच, २८ मार्च रोजी होणाऱ्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यापूर्वी स्टेडियममधील प्रवेशद्वाराजवळ एका स्मारक फलकाचे अनावरणही केले जाईल. सामन्याच्या दिवशी, त्या ११ बळींची नावे एका मोठ्या स्क्रीनवर दाखवली जातील आणि त्यानंतर एक मिनिटाचे मौन पाळले जाईल. गतविजेता बंगळूरू संघ आयपीएल २०२६ चा सलामीचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech