रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर विक्रमी गर्दी

0

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या सुट्ट्यांचा दुहेरी योग साधत रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी उसळली आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अलिबाग, किहीम, आवास, सासवणे, वरसोली, नागाव, चौल, रेवदंडा, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर आणि हरिहरेश्वर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे तसेच राज्यातील विविध भागांतून हजारो पर्यटक रायगडकडे वळल्याने सर्वत्र पर्यटनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

उन्हाचा कडाका वाढला असला तरी समुद्राच्या थंडगार पाण्यात डुंबत पर्यटकांनी उकाड्यावर मात करण्याचा आनंद घेतला. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटला. याशिवाय एटीव्ही राईड्स, बोटिंग, सागरी सफर, घोडेस्वारी आणि उंट सफारी यांसारख्या विविध पर्यटन उपक्रमांनाही मोठी मागणी असल्याचे दिसून आले.

पर्यटकांच्या संख्येबाबत बोलायचे झाल्यास, अलिबाग तालुक्यात सुमारे ५० हजार, मुरुडमध्ये १५ ते २० हजार, तर श्रीवर्धन तालुक्यात ३० ते ३५ हजार पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्येही १५ ते २० हजार पर्यटकांनी गर्दी केली. ऐतिहासिक रायगड किल्ल्यावरही पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून आले.मुंबईहून जलमार्गाने अलिबागकडे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान दर शनिवार-रविवारी सुमारे १० हजार प्रवाशांची ये-जा होत असते. मात्र गेल्या दोन दिवसांत ही संख्या जवळपास दुपटीने वाढल्याची माहिती मेरीटाईम बोर्डाच्या सूत्रांनी दिली.

पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे जिल्ह्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि लॉजेस पूर्ण क्षमतेने भरल्याचे चित्र दिसून आले. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांसाठी ही गर्दी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असून पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळाली आहे. मात्र दुसरीकडे वाढत्या पर्यटकांमुळे पायाभूत सुविधांवर ताण निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा महामार्ग, अलिबाग-वडखळ मार्ग, दिघी-माणगाव महामार्ग तसेच अलिबाग-मुरुड मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अनेक पर्यटकांना तासन्तास वाहनांच्या रांगेत अडकून पडावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.एकूणच, सलग सुट्ट्यांचा लाभ घेत कुटुंबासह पर्यटनासाठी बाहेर पडण्याची प्रवृत्ती वाढत असून, रायगडचे समुद्रकिनारे पुन्हा एकदा पर्यटकांच्या उत्साहाने गजबजून गेले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech