उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश….
(अनंत नलावडे)
मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याने विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान मुळीच खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करा, असे सक्त निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे प्रशासनाला दिले.
मुंबईतील वांद्रे येथील डॉ.बळीराम हिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषी संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
यासंदर्भात आज मंत्रालयात मंत्री पाटील यांनी त्यांच्या दालनात एका विशेष बैठकीत आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी सर्वच शैक्षणिक संस्थांचा सर्वंकष आढावा घेतला.या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी.वेणूगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी आणि मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
वांद्रे येथील डॉ.बळीराम हिरे महाविद्यालयात १३२ हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा सविस्तर आढावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेत असताना सदर मान्यताप्राप्त वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेत विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नसलेला अभ्यासक्रम सुरू करुन विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याबद्दल या संस्थेच्या मान्यतेच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या कायद्या अंतर्गत असलेल्या तरतूदी विचारात घेऊन त्यानुसार कारवाई करण्याचेही निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.
तसेच महाराष्ट्र राज्य कृषि, पशु व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यांमधील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम (प्रतिबंध) अधिनियम २०१३ मधील तरतूदीनुसार कारवाई करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे सक्षम प्राधिकरणांची मान्यता नसलेल्या विद्यापीठ अथवा अनधिकृत संस्था प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना खोटी आमिषे दाखवून अथवा संस्था मान्यताप्राप्त आहे असे भासवून प्रवेश घेण्यास प्रवृत्त करतात व नंतर विद्यार्थ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे यापुढे कोणाही विद्यार्थ्यांनी अथवा त्यांच्या पालकांनी कोणत्याही अनधिकृत संस्थेच्या अथवा विद्यापीठाच्या भूलथापांना बळी न पडता अभ्यासक्रमाची मान्यता तपासून घ्यावी, उच्च शिक्षण संचालनालय तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर अथवा सक्षम प्राधिकरणांच्या संकेतस्थळावर संबंधित संस्थेचे नाव व अभ्यासक्रम असल्याची खात्री करावी व नंतरच प्रवेश घ्यावा, असेही आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे.
भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विभागाने एक विशेष कार्यप्रणाली (SOP) तयार करावी. त्याचप्रमाणे वांद्रे येथील डॉ.बळीराम हिरे महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या १३२ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून नवीन शैक्षणिक धोरण २०२० मधील Recognition of Prior Learning तरतूदीनुसार या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासले जाईल यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (MahaSARC) ने अभ्यासून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी या बैठकीत दिल्या.