संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व्हिएतनाम आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर रवाना

0

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व्हिएतनाम आणि दक्षिण कोरियाच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले. या दोन आशियाई देशांच्या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली. इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, सामरिक लष्करी सहकार्य, संरक्षण उद्योग भागीदारी आणि सागरी सहकार्य मजबूत करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह १८ ते १९ मे दरम्यान व्हिएतनाम आणि त्यानंतर १९ ते २१ मे दरम्यान दक्षिण कोरियाचा दौरा करणार आहेत. संरक्षण मंत्र्यांचा व्हिएतनाम दौरा दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक सामरिक भागीदारीला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने होत आहे. ५ ते ७ मे दरम्यान व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान या सर्वसमावेशक सामरिक भागीदारीला उच्च स्तरावर नेण्यात आले होते. राजनाथ सिंह व्हिएतनामचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री, जनरल फान व्हान गियांग यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील.

संरक्षण मंत्र्यांच्या ८ ते १० जून २०२२ या कालावधीतील मागील दौऱ्यात, २०३० पर्यंतच्या भारत-व्हिएतनाम संरक्षण भागीदारीवरील संयुक्त दूरदृष्टी निवेदनावर स्वाक्षरी करण्यात आली होती. ही दूरदृष्टी द्विपक्षीय संरक्षण सहकार्यासाठी एक स्पष्ट आणि निश्चित मार्ग आखते. दोन्ही लोकशाही देशांचे या प्रदेशाच्या शांतता आणि समृद्धीमध्ये समान हित आहे. राजनाथ सिंह यांचा दौरा व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो चि मिन्ह यांच्या १३६ व्या जयंतीच्या दिवशी (१९ मे) होत आहे. त्यामुळे, संरक्षण मंत्री हो चि मिन्ह यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतील.

दक्षिण कोरिया दौऱ्यादरम्यान, राजनाथ सिंह हे कोरिया प्रजासत्ताकचे संरक्षण मंत्री आन ग्यु-बेक यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही मंत्री दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याचा आढावा घेतील आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी नवीन उपक्रमांवर चर्चा करतील. ते परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण करतील. संरक्षण मंत्री संरक्षण खरेदी कार्यक्रम प्रशासन (DAPA) चे मंत्री ली योंग-चोल यांचीही भेट घेतील आणि भारत-कोरिया व्यावसायिक गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील.

शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी, २१ मे रोजी दक्षिण कोरियामध्ये भारतीय युद्ध स्मारकाचे संयुक्त उद्घाटन होणार असून, याप्रसंगी दक्षिण कोरियाचे मंत्री क्वॉन ओ-यूल हेदेखील उपस्थित राहणार आहेत. भारताचे ‘ऍक्ट ईस्ट पॉलिसी’ आणि दक्षिण कोरियाची ‘इंडो-पॅसिफिक स्ट्रॅटेजी’ यांमधील नैसर्गिक ताळमेळ, तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सामायिक मूल्यांमुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. कोरिया युद्धातील भारताचे योगदान हे इतिहासातील सर्वात महत्त्वपूर्ण अध्यायांपैकी एक आहे, जे जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी भारताची अटूट वचनबद्धता दर्शवते.

भारतीय लष्कराच्या ६० पॅराशूट फील्ड ऍम्ब्युलन्सची दक्षिण कोरियामध्ये तैनाती करण्यामागे युद्धात शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्याचा हेतू होता. आपल्या तीन वर्षांहून अधिक काळाच्या सेवेदरम्यान, या युनिटने २,००,००० हून अधिक रुग्णांवर उपचार केले आणि जवळपास २,५०० शस्त्रक्रिया केल्या, तसेच असंख्य नागरिकांवरही उपचार केले. भारताचे दुसरे मोठे योगदान म्हणजे तटस्थ राष्ट्रांच्या प्रत्यावर्तन आयोगाचे अध्यक्षपद भूषवणे, जो भारताने संयुक्त राष्ट्रांना केलेला एक प्रस्ताव होता आणि तो बहुमताने स्वीकारण्यात आला. या प्रस्तावानुसार, भारतीय लष्कराच्या ५,२३० सैनिकांचा समावेश असलेल्या कस्टोडियन फोर्सने युद्धोत्तर काळात अंदाजे २,००० युद्धकैद्यांना शांततेने मायदेशी परत पाठवले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech