नीट-यूजीच्या पुनर्परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश

0

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी नीट-यूजी पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी त्यांनी परीक्षा पूर्ण पारदर्शकता, सुरक्षा आणि निष्पक्षतेने आयोजित करण्याचे निर्देश दिले. बैठकीदरम्यान शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, मागील परीक्षा प्रक्रियेत समोर आलेल्या सर्व त्रुटी पूर्णपणे दूर करण्यात याव्यात, जेणेकरून पुनर्परीक्षा त्रुटीरहित आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पडेल. त्यांनी अधिकाऱ्यांना कडक सुरक्षा प्रोटोकॉलअंतर्गत सुरक्षित, सुरळीत आणि फुलप्रूफ परीक्षा आयोजित करण्याचे निर्देश दिले.

धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यांतील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत समन्वय बैठका आयोजित करण्यासही सांगितले, जेणेकरून परीक्षा केंद्रांवरील देखरेख अधिक मजबूत होईल आणि सर्व व्यवस्थांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करता येईल. तसेच परीक्षा केंद्रांवरील सतर्कता आणि सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या सुविधेचा विचार करून वाहतूक, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची पुरेशी व्यवस्था करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले.

विशेष म्हणजे, राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा-स्नातक (नीट-यूजी) आयोजित करते. यावर्षी ३ मे रोजी नीट-यूजी २०२६ परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेमध्ये कथित अनियमितता आणि तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर एनटीएने ही परीक्षा रद्द करत २१ जून रोजी पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार असून, त्यामध्ये २२ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना यावेळी अतिरिक्त १५ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. तसेच केंद्र सरकारने संपूर्ण प्रकरणाच्या व्यापक चौकशीची जबाबदारी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्याकडे सोपवली आहे.

एजन्सीने म्हटले आहे की, पारदर्शकता, निष्पक्षता आणि परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी परीक्षा रद्द करून पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनटीएने स्पष्ट केले की, मे २०२६ सत्रासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांची माहिती, उमेदवारांचा दर्जा आणि निवडलेली परीक्षा केंद्रे पुनर्परीक्षेसाठी वैध राहतील. यासाठी पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही आणि कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. एजन्सीने असेही सांगितले की, विद्यार्थ्यांनी पूर्वी भरलेले परीक्षा शुल्क परत केले जाईल आणि पुनर्परीक्षा एनटीए आपल्या अंतर्गत संसाधनांच्या माध्यमातून आयोजित करेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech