फाईल्सचे कामही केले पूर्ण
मुंबई : पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी बाईकवरून विधान भवनात पोहोचले होते. यानंतर आता त्यांचा वन्दे भारत ट्रेनने मुंबई ते शिर्डीपर्यंतचा प्रवास केला, हा प्रवास चर्चेचा विषय ठरला. मोठं-मोठे ताफे न घेता त्यांनी सर्वांप्रमाणे मुंबई ते शिर्डी वन्दे भारत ट्रेनने प्रवास केला, यावेळी त्यांच्यासोबत प्रसाद लाड देखील होते.
शिर्डी एमआयडीसीमध्ये निबे समूहाच्या संरक्षण उत्पादन कॉम्प्लेक्सचे उदघाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. त्यासाठी त्यांनी स्वतः वन्दे भारत ट्रेनने प्रवास केला. ते मुंबईवरून ट्रेनने शिर्डीला आले. त्यांनी इतरांसमोर आपल्या कृतीतून उदाहरण ठेवलं. आपल्या या ट्रेन प्रवासाच्या अनुभवाबद्दल त्यांनी मीडियाशी आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्रेन प्रवासादरम्यान मुख्यमंत्री काही काळ सगळ्यांशी संवाद साधत होते आणि नंतर लगेच कामाला लागले. ते स्वतःच्या फाईल्सचे काम पूर्ण करू लागले. या वेळचा त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
“वन्दे भारत ट्रेन ही नवं भारताची एक अनुपम भेट माननीय मोदीजींनी दिली आहे. जगातल्या विकसित राष्ट्रांमध्ये जशा ट्रेन आहेत, तशा प्रकारची ही वन्दे भारत ट्रेन आहे. आज मी याच ट्रेनने मुंबईवरुन साईनगर शिर्डीला आलो. अतिशय उत्तम प्रवास झाला. खूप चांगला अनुभव होता. अनेक लोकांच्या भेटी झाल्या. रस्त्यात फाईल्सची कामं करता आली. मला आजचा प्रवास लाभदायी वाटला”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे. माझा प्रयत्न जिथे-जिथे शक्य आहे, तिथे-तिथे त्या-त्या ठिकाणी पंतप्रधानांनी जे काय आवाहन केलंय, त्या आवाहनानुसार काम करावं. आपण केलं तर लोकांना देखील इच्छा निर्माण होते, तो माझा प्रयत्न आहे”, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
साईबाबांच्या शिर्डीबद्दलही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “खूप आनंदाची गोष्ट आहे. भक्ती आणि शक्ती भारतीय अध्यात्मात एकत्र आहे. आपण सगळे भक्ती आणि शक्तीचे उपासक आहोत. त्यामुळे शांतता तेच प्रस्थापित करु शकतात, जे शक्तीमान असतात. दुर्बल व्यक्ती कधी शांतता प्रस्थापित करु शकत नाही. आपण शक्तीमान असलो तर जगाला साईंचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश शिकवू शकतो” असं मुख्यमंत्री म्हणाले.