लखनौ: अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत भाविकांनी अर्पण केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीत मोठा गैरव्यवहार झाला असून, ही रक्कम गायब झाल्याचा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी केला आहे. हा प्रकार जगभरातील रामभक्तांसाठी अत्यंत धक्कादायक आणि मंदिर ट्रस्टसाठी ‘लांछनास्पद’ असल्याचे अखिलेश यांनी म्हटले आहे. या प्रकरणावर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेश सरकारकडून बाळगण्यात आलेल्या संशयास्पद मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अखिलेश यादव यांनी न्यायालयाकडे या प्रकरणाची स्वतःहून (स्यू मोटो) दखल घेत सखोल न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे; दरम्यान, या गंभीर आरोपांवर प्रतिक्रिया देताना ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सदस्य महंत दिनेंद्र दास यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, “आमचा प्रभू रामावर पूर्ण विश्वास आहे आणि आमचा कोणताही विश्वस्त असे कृत्य करणार नाही; तरीही यासंदर्भात शासनाने सखोल चौकशी केल्यास आमची कोणतीही हरकत नाही.” ट्रस्ट कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे महंत दिनेंद्र दास यांनी जाहीर केले आहे.