नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांनी निकालानंतरच्या सेवांसाठीच्या (पोस्ट-रिझल्ट सर्व्हिसेस) पोर्टलच्या कार्यप्रणालीबाबत काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांवर आणि सोशल मीडियावरील पोस्टवर सोमवारी स्पष्टीकरण जारी केले. मंडळाने सांगितले की, पडताळणी (व्हेरिफिकेशन) आणि पुनर्मूल्यांकन (री-इव्हॅल्युएशन) यासाठीची अर्ज प्रक्रिया २ जून ते ७ जूनदरम्यान पूर्णपणे सुरळीतपणे सुरू होती. या कालावधीत १.६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ३.८ लाखांपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांशी संबंधित विनंत्या नोंदवल्या.
मंडळाच्या माहितीनुसार, या कालावधीत सरकारी तांत्रिक संस्थांच्या तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या तज्ज्ञ पथकांच्या देखरेखीखाली पोर्टलचे संचालन करण्यात आले. पोर्टलला सायबर हल्ले आणि इतर ऑनलाइन धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा पथकांकडून सातत्याने देखरेख करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सीबीएसईची हेल्पडेस्क आणि तक्रार निवारण प्रणालीही सक्रिय होती.
मंडळाने स्पष्ट केले की, निकाल पाहताना दिसणारा ‘रोल नंबर नॉट फाऊंड’ हा संदेश कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे नव्हता. हा संदेश अशा विद्यार्थ्यांना दिसला, ज्यांनी निकालानंतरच्या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत मिळविण्यासाठी अर्ज केलेला नव्हता. सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात उत्तरपत्रिकेची छायाप्रत (फोटोकॉपी) किंवा स्कॅन प्रत मिळविण्यासाठी अर्ज केला होता, तेच पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनाच्या पुढील प्रक्रियेसाठी पात्र होते.
सीबीएसईने म्हटले आहे की, मंडळ पारदर्शक, विद्यार्थी-केंद्रित आणि अखंडित निकालोत्तर प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व वास्तविक तक्रारी आणि समस्यांचे निराकरण हेल्पलाइन, तक्रार निवारण यंत्रणा आणि इतर संवाद माध्यमांद्वारे पुढेही केले जाईल.