अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

0

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी १० लाख ८ हजार ९४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. विशेष फेरी-१ अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे वाटप झाले आहे, त्यांना संबंधित महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ‘Proceed for Admission’ पर्यायाचा वापर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार ८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर १० जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रियेतील सर्व कार्यवाही निर्धारित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech