पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४ बाय ७ ‘अलर्ट मोड’वर – मुख्यमंत्री

0

अत्यावश्यक असल्याशिवाय दोन दिवस नागरिकांनी घराबाहेर पडू नये; राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला आढावा

मुंबई : मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. यासोबतच आज दुपारी ३ ते ४.३० वाजे दरम्यान समुद्राला भरती येण्याची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन परिस्थिती आल्यास तातडीने मदत कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने आज आणि उद्या अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये , असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये आयोजित बैठकीत राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि किनारी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस अपेक्षित आहेत. अपेक्षित उच्च भरतीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांना ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आले आहेत. पुराची परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने ‘एसडीआरएफ’ आणि ‘एनडीआरएफ’ ची पथके रवाना करण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळेल, याची काळजी घ्यावी.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे तात्काळ दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून महामार्गावरील मलबा हटविण्यात यावा. पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन संभाव्य दरड कोसळणाऱ्या ठिकाणी पथके सज्ज ठेवावीत. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर यावेळी अनपेक्षित ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून दरडीचा मलबा तात्काळ हटविण्यात यावा. कुठल्याही परिस्थितीत वाहतुकीचे कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech