मुंबई : मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज व यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. ५ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा व पुणे जिल्ह्यातील घाट परिसरास ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दि. ६ ऑगस्ट रोजी नाशिक घाट, सातारा घाट, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
७ ऑगस्ट रोजी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.