ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या ऑगस्ट २०२४ पासून भारतात वास्तव्यास आहेत. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर त्या भारतातच राहात आहेत. शेख हसीना यांनी यावर्षी डिसेंबरपर्यंत बांगलादेशात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर बांगलादेशातील विद्यार्थी नेते नाहिद इस्लाम यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेख हसीना देशात परतल्यास त्यांना विमानतळावरून थेट फाशीच्या तख्तापर्यंत नेले जाईल, असे विधान त्यांनी केले आहे.
नॅशनल सिटिझन पार्टी (एनसीपी)चे संयोजक आणि संसदेतील विरोधी पक्षाचे मुख्य व्हीप नाहिद इस्लाम यांनी ३ ऑगस्ट रोजी ढाका येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हटले, “पंतप्रधान तारिक रहमान यांनी दिल्लीशी करार करून शेख हसीना यांना परत आणले, तरीही जनता आणि जुलै आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांचा संघर्ष सुरूच राहील. शेख हसीना यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत लोक रस्त्यावरून हटणार नाहीत.” नाहिद इस्लाम यांनी स्पष्ट केले की, “आमचे जनआंदोलन कोणत्याही विशिष्ट नेत्याला सत्तेत बसवण्यासाठी नव्हते. हुकूमशाही व्यवस्था, खंडणीखोरी आणि भ्रष्टाचार कायमचा संपवण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात आले होते.”
यावेळी त्यांनी सरकारवरही टीका केली. “गेल्या काही महिन्यांत सरकार बदलले असले तरी परिस्थितीत कोणतीही लक्षणीय सुधारणा झालेली नाही. लाचखोरी, भ्रष्टाचार, वीज व गॅस टंचाई यांसारख्या समस्या अद्याप कायम आहेत. आंदोलनातील शहीद आणि जखमींच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी सरकारने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत, जरी हे लोक देशाची खरी संपत्ती आहेत,” असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या व्यापक आंदोलनानंतर शेख हसीना यांचे सुमारे १५ वर्षांचे सरकार सत्तेवरून पायउतार झाले होते. आंदोलनादरम्यान निदर्शकांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर हल्ला केला होता. त्यानंतर शेख हसीना यांनी हेलिकॉप्टरद्वारे देश सोडून भारतात आश्रय घेतला होता.