मुंबई : वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या लेखन/दिग्दर्शनातून साकारलेला ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. प्रेक्षकांच्या या अफाट प्रतिसादानंतर आणि चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर, ‘देऊळ बंद २’ च्या मुख्य कलाकारांनी आणि तंत्रज्ञांच्या टीमने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
मुंबईत पार पडलेल्या या विशेष भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘देऊळ बंद २’ च्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले. महाराष्ट्रातील प्रेक्षक या चित्रपटाला देत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “समाजातील सर्व थरांना, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी वर्गापर्यंत सर्वांना एकत्र आणण्याची आणि त्यांच्या भावनांना साद घालण्याची ताकद या चित्रपटात आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि चित्रपटाच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, लेखक दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, निर्माते कैलाश वाणी,अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अतुल कुडले, सुनील पालकर, तंत्रज्ञ संकेत धोटकर, कॅमेरामन प्रशांत मिसळे, जगदीश चव्हाण तसेच लीड मीडिया पीआर आणि मार्केटिंगचे कुशल कोंडे, अनुप गोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. भेटी दरम्यान प्रविण तरडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना “प्रेक्षकांनी ‘देऊळ बंद २’ ला जे भरभरून प्रेम दिले, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे ऋणी आहोत. त्यातच आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आमच्या संपूर्ण टीमचा उत्साह द्विगुणित करणारी आहे.” असे उद्गार काढले.
‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने महाराष्ट्रातील छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांमधील मल्टिप्लेक्सपर्यंत सर्वत्र प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी भागातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील सर्व स्तरांतील प्रेक्षक सहकुटुंब या चित्रपटाला गर्दी करत आहेत. वाढत्या मागणीमुळे राज्यभरातील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटासाठी ‘हाउसफुल्ल’चे बोर्ड झळकत असून, दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी भक्कम सुरू आहे.