मुंबई : येथील पायधुनी भागात एकाच कुटुंबातील चौघा जणांचा कलिंगड खाल्ल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र आता न्यायवैद्यक अहवालात अधिकाऱ्यांना पीडितांचे मृतदेह आणि त्यांनी खाल्लेल्या फळाच्या नमुन्यांमध्ये उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी पदार्थाचे अंश आढळले आहेत. त्यांच्या शवविच्छेदनानंतर काही दिवसांनी या प्रकरणात वेगळीच माहिती समोर आली आहे. ज्यात त्यांच्या अंतर्गत अवयवांमध्ये हिरवट रंग आढळून आला होता, जो विषबाधेच्या लक्षणांशी सुसंगत आहे.
यामध्ये अब्दुल्ला डोकाडिया (४५), त्यांची पत्नी नसरीन (३५) आणि त्यांची मुले, झैनब (१३) व आयेशा (१६) यांनी मुंबईतील त्यांच्या घरी नातेवाईकांसाठी जेवणाचे आयोजन केले होते आणि मटण पुलाव दिला होता. नातेवाईक निघून गेल्यानंतर काही तासांनी, मध्यरात्री १ वाजता कुटुंबाने कलिंगड खाल्ले. पहाटे ५ वाजेपर्यंत, त्या सर्वांना तीव्र उलट्या आणि जुलाब होऊ लागले आणि काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला. न्यायवैद्यक चाचण्यांमधून हे उघड झाले आहे की, त्या चौघांचा मृत्यू एका प्राणघातक उंदीर नाशकामुळे झाला. डॉक्टरांना त्यांच्या शरीरात झिंक फॉस्फाईटचे अंश आढळले आहेत, जे उंदीर मारण्याच्या विषात वापरले जाणारे एक विषारी रसायन आहे.
पीडितांचे मेंदू, हृदय आणि आतड्यांसह काही अवयव हिरवे झाले होते, जे विषबाधेचे लक्षण आहे. या चाचण्यांमध्ये अब्दुल्ला डोकाडियाच्या शरीरात मॉर्फिन, एक प्रभावी वेदनाशामक औषध, जे सहसा नियंत्रित वैद्यकीय परिस्थितीत दिले जाते, ते देखील आढळले होते. या निष्कर्षातून पूर्वीची वैद्यकीय प्रक्रिया, अपघाती संपर्क की आणखी काही संशयास्पद गोष्ट समोर येते, याचा तपास अधिकारी करत होते. हे रसायन फळात अपघाताने मिसळले गेले की ते जाणूनबुजून टोचले गेले, याचा तपास आता तपास अधिकारी करत आहेत. दरम्यान पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती आणि पुलाव खाल्लेल्या व सुखरूप राहिलेल्या कुटुंबाच्या पाहुण्यांचे जबाब नोंदवले होते.