मुंबई : टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि अत्यंत कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा कोणत्याही संघटित टोळीचा भाग असो, त्याला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. संबंधितांवर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल.
राज्य सरकार भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर काम करत असून, पेपरफुटी हा प्रकार केवळ गैरव्यवहार नसून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप धारण करणारा गंभीर अपराध असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांच्या तत्पर आणि सतर्क कारवाईचे विशेष कौतुक केले. गुप्त माहितीच्या आधारे तातडीने छापे टाकून पोलिसांनी लाखो मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचवले, असे त्यांनी म्हटले.
टीईटी परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांना आश्वस्त करताना शिंदे म्हणाले की, ही परीक्षा लवकरात लवकर पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पुन्हा घेतली जाईल. कोणत्याही प्रामाणिक उमेदवाराच्या हक्कावर गदा येऊ दिली जाणार नाही. महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचारमुक्त, गुणवत्तापूर्ण आणि अधिक सक्षम बनवणे हे महायुती सरकारचे ठाम ध्येय असल्याची ग्वाहीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.