संघर्ष नव्हे, सहकार्याचा मार्ग निवडा’; पंतप्रधान मोदींचा अंतराळ क्षेत्रासाठी जगाला संदेश

0

नवी दिल्ली : अंतराळाच्या बदलत्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय अंतराळ शिखर परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. अंतराळातील वाढत्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगाने संघर्षाऐवजी सहकार्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, अंतराळातील शक्यता अमर्याद आहेत; मात्र त्याची जबाबदारी सामूहिक आहे. जसजसे अंतराळातील कक्षा अधिक गर्दीच्या होत आहेत, तंत्रज्ञान अधिक सामर्थ्यवान बनत आहे आणि अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या देशांची तसेच इतर घटकांची संख्या वाढत आहे, तसतसे जागतिक पातळीवरील निर्णयही अधिक स्पष्ट आणि जबाबदार असणे आवश्यक आहे. सहकार्याला संघर्षापेक्षा, स्थैर्याला तात्कालिक फायद्यापेक्षा आणि सर्वसमावेशकतेला बहिष्कारापेक्षा प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी सांगितले की, भारताचा अंतराळविषयक दृष्टिकोन ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित आहे. म्हणजेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’. आता ही भावना पृथ्वीपलीकडे अंतराळापर्यंत नेण्याची वेळ आली आहे. भारत सुरक्षित, संरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राला पाठिंबा देतो. यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे, संवाद आणि बहुपक्षीय सहकार्य यांना आधारभूत मानले पाहिजे. वैज्ञानिक माहितीचा वापर पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाने संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी केला गेला पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. त्यांनी इस्रोला भारताच्या अंतराळ प्रवासाच्या केंद्रस्थानी असल्याचे नमूद केले. इस्रोने आपल्या उत्कृष्ट कामगिरीसह कमी खर्चातील अंतराळ मोहिमांमुळे जगभरात आदराचे स्थान मिळवले आहे, असे त्यांनी सांगितले.

इस्रोच्या क्षमतेचा लाभ शेतकरी आणि मच्छीमारांना होत आहे. हवामानाची माहिती, आपत्ती व्यवस्थापन आणि दिशादर्शन यांसारख्या क्षेत्रांतही इस्रोचे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार, ३४ देशांतील ४३० हून अधिक उपग्रह भारतीय रॉकेटच्या माध्यमातून अंतराळात पाठवण्यात आले आहेत. इस्रोचे तंत्रज्ञान आणि त्याच्या भागीदाऱ्या केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या सेवेसाठी कार्यरत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या या विश्वासामागे अनेक पिढ्यांपासून कार्यरत असलेल्या भारतीय वैज्ञानिक, अभियंते आणि तंत्रज्ञांची मेहनत आहे. त्यांनी मोहिमांमागून मोहिमा यशस्वी करत भारताला अंतराळ क्षेत्रातील आघाडीच्या देशांमध्ये गौरवपूर्ण स्थान मिळवून दिले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech