नवी दिल्ली : केंद्र सरकारने नीट-यूजी पेपरफुटीशी संबंधित टेलिग्राम ग्रुप्स आणि चॅनेल्समधील अनियमिततेबाबत दिल्ली उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, नीट पेपरफुटीमध्ये टेलिग्रामच्या गैरवापराबाबत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
प्रतिज्ञापत्रानुसार, एनटीएने फुटलेली प्रश्नपत्रिका पसरवण्यात आणि नीट परीक्षेसंबंधित फसवणुकीच्या कारवायांमध्ये सामील असलेले अनेक टेलिग्राम चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्स ओळखले होते. केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांनी सुरुवातीला कमीत कमी निर्बंधांचा दृष्टिकोन स्वीकारला आणि टेलिग्रामवर त्वरित बंदी घातली नाही. ॲपवर बंदी घालण्याऐवजी, अधिकाऱ्यांनी ३ जून २०२६ रोजी टेलिग्रामच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावले. या बैठकीदरम्यान, सरकारने चिंता व्यक्त केली की, फुटलेल्या प्रश्नपत्रिका पसरवणाऱ्या चॅनेल्सना सक्रियपणे ओळखण्यात आणि थांबवण्यात टेलिग्राम अपयशी ठरले आहे.केंद्राने सांगितले की, अशा प्रकारची सामग्री सक्रियपणे शोधण्यात टेलिग्रामच्या मर्यादा आहेत आणि तक्रार केलेल्या चॅनेलवर नियंत्रक (मॉडरेटर्स) काम करत आहेत.
नीट यूजी २०२६ परीक्षा ३ मे रोजी झाली होती. पण परीक्षा होण्यापूर्वीच पेपर फुटल्याचे परीक्षेनंतर उघड झाले होते. नीट यूजी फेरपरीक्षा आता २१ जून रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवल्या जातील आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.