नेपाळ जातीय हिंसाचार: पंतप्रधान बालेन शाह यांचे शांततेचे आवाहन करत कारवाईची ग्वाही

0

काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी देशाच्या आग्नेयेकडील मधेश प्रांतात उसळलेल्या सांप्रदायिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक भागांमध्ये संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान बालेन शाह यांनी सांगितले की, सरकार या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेले जय प्रकाश मेहता, ओम प्रकाश मेहता आणि गणेश यादव यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच, या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीनंतर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पंतप्रधानांनी सांगितले की, गृह मंत्रालयाने या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना केली आहे. तसेच, सर्व जखमींना योग्य आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. त्यांनी नागरिकांना सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून अफवा, अप्रमाणित माहिती अथवा सांप्रदायिक तेढ वाढवणारा मजकूर प्रसारित न करण्याचे आवाहन केले.

हिंसाचार वाढल्यानंतर विरोधी पक्षांनी शाह सरकारवर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. विरोधी पक्षांच्या मते, सरकारने वेळेत सर्वपक्षीय बैठक बोलावली नाही आणि राष्ट्रीय स्तरावर आवश्यक नेतृत्व दाखवण्यात अपयश आले. तसेच, बुधवारी आयोजित सर्वपक्षीय बैठकीस पंतप्रधान आणि गृहमंत्री अनुपस्थित राहिल्याबद्दलही सरकारवर टीका करण्यात आली. मात्र, गुरुवारी पंतप्रधान बालेन शाह यांनी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची भेट घेऊन त्यांना सुरक्षा परिस्थितीची माहिती दिली.

मधेश प्रांतातील सिराहा, धनुषा आणि सुनसरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारीही तणावपूर्ण वातावरण कायम होते. सिराहाच्या गोलबाजार आणि लहान तसेच धनुषाच्या जनकपूरधाम येथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमकी झाल्या. सिराहा येथे गोळीबारात किशोरवयीन गणेश यादव यांचा मृत्यू झाला. तर सुनसरी जिल्ह्यातील पूर्वीच्या हिंसाचारात जखमी झालेले जय प्रकाश मेहता यांचे उपचारादरम्यान निधन झाले. यापूर्वी ओम प्रकाश मेहता यांचाही मृत्यू झाला होता.

हिंसाचारादरम्यान जाळपोळीच्या घटनाही घडल्या. परिस्थिती लक्षात घेऊन सिराहा आणि जनकपूरधाममधील अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर भारताच्या सीमेलगत असलेल्या पर्सा जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. हा हिंसाचार २६ जुलै रोजी सुनसरी जिल्ह्यातील देवानगंज ग्रामीण नगरपालिकेच्या कप्तानगंज परिसरात सुरू झाला. श्रावण महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘बोलबम यात्रे’दरम्यान हिंदू भाविक पवित्र जल घेऊन डीजेच्या गजरात जात होते. पोलिसांच्या माहितीनुसार, मोठ्या आवाजात वाजवण्यात येणाऱ्या डीजेला मुस्लिम समाजातील काही लोकांनी आक्षेप घेतला.

सुरुवातीला दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला, जो नंतर हाणामारी आणि हिंसाचारात परिवर्तित झाला. काही वेळातच दोन्ही समुदायांतील मोठ्या संख्येने लोक लाठ्या, दगड, बांबू आणि लोखंडी रॉड घेऊन घटनास्थळी जमले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. याच दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात ओम प्रकाश मेहता यांचा मृत्यू झाला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech