ओमान किनाऱ्यावरील टँकर हल्ल्यानंतर २४ भारतीय खलाशांची सुखरूप सुटका

0

नवी दिल्ली : ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी तेलवाहू टँकरवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर त्यावरील २४ भारतीय खलाशांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले. भारत आणि ओमान यांच्यातील सागरी बचाव सहकार्याचे हे एक महत्त्वपूर्ण उदाहरण मानले जात आहे. सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झाल्याची किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे २.२० वाजता मुंबईस्थित मेरीटाईम रेस्क्यू को-ऑर्डिनेशन सेंटरला पलाऊच्या ध्वजाखाली नोंदणीकृत असलेल्या एमटी मारिव्हेक्स या तेलवाहू टँकरवर ओमानमधील मसिराह किनाऱ्याजवळ क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी जहाजावर एकूण २४ कर्मचारी होते आणि ते सर्व भारतीय नागरिक होते. जहाजावरील एका खलाशाच्या नातेवाईकांनी एमआरसीसी मुंबईला ही माहिती दिली होती.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआरसीसी मुंबईने तत्काळ ओमानच्या सागरी शोध आणि बचाव केंद्राशी (ओएमएससी) संपर्क साधला आणि जहाज व त्यावरील कर्मचाऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानंतर ओमानच्या यंत्रणांनी वेगाने कारवाई सुरू केली. बचाव मोहिमेअंतर्गत ओमानने जवळील एका जहाजाला घटनास्थळी पाठवले तसेच दोन बचाव हेलिकॉप्टरही तैनात केले. संपूर्ण मोहिमेदरम्यान एमआरसीसी मुंबई, ओएमएससी ओमान आणि इतर संबंधित संस्थांमध्ये सातत्याने समन्वय ठेवण्यात आला, जेणेकरून खलाशांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल.

सायंकाळी सुमारे ५ वाजता ओमानच्या सागरी बचाव केंद्राने पुष्टी केली की, ओमान नौदलाच्या हेलिकॉप्टरांनी सर्व २४ भारतीय खलाशांना सुरक्षित बाहेर काढले आहे. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून कोणत्याही प्रकारच्या हानीची नोंद झालेली नाही. हल्ल्याचे लक्ष्य ठरलेले जहाज सध्या मसिराह किनाऱ्याजवळ नांगरून ठेवण्यात आले आहे.

या घटनेनंतर भारतीय तटरक्षक दलानेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली. तटरक्षक दलाने सांगितले की,एमआरसीसी मुंबईने माहिती मिळताच ओमानच्या यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला, ज्यामुळे सर्व भारतीय खलाशांना सुरक्षितपणे वाचवता आले. हिंद महासागर क्षेत्रातील भारतीय नागरिक आणि खलाशांच्या सुरक्षेसाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही भारतीय तटरक्षक दलाने स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांच्या मते, ही यशस्वी मोहीम आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्याच्या बळकटीचे प्रतीक आहे. तसेच समुद्रातील आपत्कालीन परिस्थितीत भारत आणि त्याचे सहयोगी देश एकत्रितपणे जलद आणि प्रभावी बचावकार्य करू शकतात, हेही या घटनेतून सिद्ध झाले आहे. सोमवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ २४ भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या एका तेलवाहू टँकरला आग लागल्याची माहिती समोर आली. इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धविरामानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर हल्ल्यांच्या घटना घडत असताना ही घटना घडली आहे.

भारताच्या बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे संचालक ओपेश कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मेडागास्करच्या ध्वजाखाली नोंदणीकृत एमटी मारिव्हेक्सया जहाजाला दुपारी सुमारे १.३० वाजता (IST) आग लागल्याची माहिती मिळाली. आगीचे नेमके कारण काय होते याबाबत त्यांनी कोणतीही टिप्पणी केली नाही. मात्र जहाजावर २४ भारतीय खलाशी असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, “आम्हाला मिळालेली ही प्राथमिक माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही परराष्ट्र मंत्रालय, परदेशातील भारतीय दूतावास, भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालय यांच्याशी समन्वय साधत आहोत.” शिप-ट्रॅकिंग डेटानुसार हे जहाज मस्कतच्या दक्षिणेला नांगरून उभे होते. सायंकाळी सुमारे ५ वाजता ओमानच्या सागरी बचाव केंद्राने सर्व २४ भारतीय खलाशांची सुरक्षित सुटका झाल्याची अधिकृत पुष्टी केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech