कोलकाता : तीन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर पोहोचलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिलीगुडी कॉरिडॉर अर्थात ‘चिकन नेक’च्या सुरक्षेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) विशेष बैठकीत त्यांनी सांगितले की, ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणाऱ्या या संवेदनशील भौगोलिक क्षेत्राची सुरक्षा केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यांमध्ये आहे.
अमित शाह यांनी सांगितले की, सिलीगुडी कॉरिडॉरची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी विशेष ‘त्रिकोणी सुरक्षा ग्रिड’ तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत चोपडा, किशनगंज आणि धुबरी येथील तीन प्रमुख तळांवरून संपूर्ण कॉरिडॉर क्षेत्राच्या देखरेखीसह सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले की, देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. त्यांनी सीमावर्ती भागात कुंपण उभारण्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध नसण्याच्या जुन्या समस्येचाही उल्लेख केला. मात्र, सध्याच्या राज्य सरकारच्या कार्यकाळात या दिशेने सहकार्य मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
अमित शाह यांनी या भागातील पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या योजनांचीही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, 2027 च्या अर्थसंकल्पात दिल्ली-सिलीगुडी रेल्वे कॉरिडॉर उभारण्याच्या योजनेचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे उत्तर बंगाल आणि सिलीगुडी कॉरिडॉरची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांचे वक्तव्य सिलीगुडी कॉरिडॉरचे रणनीतिक स्थान आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वाढते महत्त्व अधोरेखित करणारे मानले जात आहे.