नवी दिल्ली : ओडिशातील पारादीप किनाऱ्यापासून सुमारे २४० नॉटिकल मैल (४४४ किलोमीटर) अंतरावर बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज एमवी ओशन विनर बुडाले. जहाजावर २४ क्रू सदस्य होते, त्यामध्ये २० चिनी नागरिक, म्यानमारचे तीन नागरिक आणि बांगलादेशचा एक नागरिक यांचा समावेश होता. भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत दोन जणांना सुरक्षित वाचवले असून, उर्वरितांचा शोध सुरू आहे.
हे जहाज पारादीप बंदरातून १७०० टन लोहखनिज घेऊन सिंगापूरला जात होते. २० ऑगस्टच्या रात्री जहाज रवाना झाले होते आणि समुद्रात पुढे जात असताना त्याचा संपर्क तुटला. त्यानंतर भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने संयुक्त शोध व बचाव मोहीम सुरू केली. श्री विजयपुरम (पूर्वीचे पोर्ट ब्लेअर) येथून दोन जहाजे रवाना करण्यात आली आहेत. परिसरात उपस्थित असलेल्या इतर जहाजांनाही सतर्क करण्यात आले आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी एक्सवर लिहिले की, या घटनेमुळे ते अत्यंत चिंतेत आहेत. सर्व यंत्रणा एकत्रितपणे बचाव मोहीम राबवत आहेत. दोन जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून, त्यांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. पारादीप पोर्ट अथॉरिटीचे डेप्युटी कंझर्व्हेटर कॅप्टन अलेखा चरण साहू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जहाजावरील सर्व लोक सुखरूप असतील अशी त्यांना आशा आहे. सध्या जहाज बुडण्याचे कारण समजू शकलेले नाही.