संसद रत्न पुरस्कारासाठी १२ खासदारांची निवड, महाराष्ट्राच्या ५ खासदारांना पुरस्कार जाहीर

0
  • श्रीकांत शिंदे, निशिकांत दुबे यांचाही पुरस्कारात समावेश.
  • संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांचा सन्मान.

नवी दिल्ली : देशातील सर्वात प्रतिष्ठित कायदेविषयक सन्मानांपैकी एक असलेल्या संसद रत्न पुरस्काराच्या या वर्षीच्या विजेत्यांची निवड झाली आहे. प्राईम पॉईंट फाऊंडेशन या खाजगी संस्थेने या वर्षीच्या पुरस्कारासाठी १२ खासदार आणि चार संसदीय समित्यांच्या निवडीची घोषणा केली आहे. सभागृहातील खासदारांची उत्कृष्ट कामगिरी, सार्वजनिक प्रश्न मांडण्यात त्यांचा सहभाग आणि कायदेविषयक कामातील त्यांचा सक्रिय सहभाग यावर ही निवड आधारित होती. या सर्व निवडलेल्या विजेत्यांना येत्या काही दिवसांत होणाऱ्या एका भव्य समारंभात प्रतिष्ठित ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार आहे.

संसद रत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संसद रत्न या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, डॉ. हेमंत विष्णू सावरा, पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, जळगावच्या लोकसभा खासदार स्मिता उदय वाघ अशा पाच खासदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात दोन महिला खासदारांनाही संसद रत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ज्युरी समितीने यंदाच्या पुरस्कारांसाठी १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि ४ संसदीय स्थायी समित्यांची निवड केली आहे. २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरपर्यंत संसदेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील इतर महत्त्वाच्या खासदारांनाही या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल, राजस्थानचे पी. पी. चौधरी, झारखंडचे निशिकांत दुबे, उत्तर प्रदेशचे प्रवीण पटेल, झारखंडचे विद्युत बरन महतो आणि राजस्थानचे लुम्बाराम चौधरी यांचा समावेश आहे. या विजेत्यांमध्ये जगदंबिका पाल आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री डॉ. चरणजितसिंग चन्नी या दोन माजी मुख्यमंत्र्यांचा, तर गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नरहरी अमीन यांचा समावेश आहे.

खासदारांसोबतच, संसदेच्या चार सर्वात प्रभावी आणि सक्रिय समित्यांनाही या वर्षीच्या पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या समित्यांनी विविध धोरणात्मक बाबी आणि जनहित विषयांवर उत्कृष्ट आढावा आणि अहवाल सादर केले आहेत. पुरस्कारासाठी निवडलेल्या समित्यांमध्ये चरणजीत सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखालील कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालील वित्त समिती, सप्तगिरी शंकर उलाका यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामीण विकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील कोळसा आणि खाण समिती यांचा समावेश आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech