हैदराबाद : तेलंगणामध्ये भीषण उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघातामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूच्या घटना राज्यातील सात वेगवेगळ्या जिल्ह्यांत घडल्या आहेत. राज्याचे महसूल मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी शनिवारी ही माहिती दिली. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची अनुग्रह मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे. शनिवारी तेलंगणाचे महसूल मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी सचिवालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत उष्णतेच्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. मंत्र्यांनी सांगितले की, जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यात चार, वारंगल शहरी, करीमनगर आणि निजामाबाद येथे प्रत्येकी तीन, तर जोगुलांबा गडवाल, रंगारेड्डी आणि सूर्यापेट जिल्ह्यांत प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
महसूल मंत्री रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, ज्या मंडळांमध्ये आणि गावांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे, तेथील नागरिकांना आधीच इशारे देण्यात यावेत. बसस्थानके, बाजारपेठा आणि मजुरांच्या गर्दीच्या ठिकाणी थंड पिण्याचे पाणी, ताक आणि ओआरएस पॅकेट्सची उपलब्धता सुनिश्चित करण्यात यावी. मानवी जीविताच्या सुरक्षेबाबत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी तीन दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी नागरिकांना सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले आणि आधीपासून आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी अत्यावश्यक कामाशिवाय घरातच राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला होता. हवामान विभागाच्या माहितीनुसार, तेलंगणामध्ये भीषण उष्णता आणि उष्णतेची लाट २६ मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः करीमनगर, पेद्दापल्ली, जयशंकर भूपालपल्ली, मुलुगु, खम्मम, नलगोंडा, सूर्यापेट, महबूबनगर, हैदराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.