यवतमाळ : दोन आठवड्यांपूर्वी खासदारांची बैठक घेतली. तेव्हा खासदार संजय देशमुख म्हणाले, मला मुलीची सोयरीक जुळवायची आहे. व्हिडिओ कॉलवरून हजर राहतो. मला काय माहीत मुलीची सोयरिक जुळवत होते की स्वत:ची सोयरीक जुळवत होते. मी रात्री फोन केला. जुळलं का. हो म्हणाले. जुळलं दोन दिवसाने कळलं. गेले सासरी, आता नांदा तिकडे, गद्दाराच्या कळपात नांदा. इथे वाघाचं जीवन जगत होते. तिकडे गाढवाचं जीवन जगा, असी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर केली. ठाकरे सध्या फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत. आजपासून पुढील दोन दिवस त्यांच्या सभा पार पडणार आहेत. आज २७ जून रोजी त्यांनी यवतमाळ येथे जात पहिली सभा घेतली.
ठाकरे पुढे म्हणाले की, माझ्या शब्दावर जनतेने काहीही विचार न करता या खासदारांना निवडून दिलं, आज त्यांनी लोकांचा विश्वासघात केला; त्याबद्दल मी जनतेची माफी मागणार आहे. मला खात्री आहे, जे फुटले ते खासदार आणि जे निष्ठावंत राहिले ते माझे कार्यकर्ते; त्यामुळे अशा गद्दारांचे जाणंच योग्य होतं. आता हा गद्दार जिथे सापडेल तिथे जाब विचारा. मी निवडून आणलं, का गद्दारी केली. मला पैसे मिळाले असते तर मीही तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याला जागलो, निष्ठेला जागलो, तू बोल का गद्दारी केली. असं विचारा. पुढचे तीन वर्ष हा कार्यक्रम करावा लागेल, असं आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले.
निवडणुका नसतानाही फोडाफोडी केल्या जात आहे. हा काळ असा त्यांनी निवडला. लोकसभेला आलो होतो. त्यांची घोषणा होती अब की बार ४०० पार. मी म्हणालो होतो, अब की बार तडीपार. त्यांना संविधान बदलायचं आहे. फोडाफोडी करायची आहे. घटनेत बदल केला की पाहिजे ते करता येईल. गुलामगिरी आणि हुकूमशाहीची राजवट रोखण्यासाठी आपण मैदानात आहोत. बाकी राज्य उठतील तेव्हा उठतील. पण महाराष्ट्र जागा राहणार की नाही हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. हे काम सोपं नाहीये. त्याने गद्दारी का केली. तर तुमचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं आहे. पुढचा खासदार भगव्याचा कट्टर असला पाहिजे. शिवसेना एकच आणि भगवा एकच. दोन किंवा तीन वर्षाने जेव्हा निवडणुका होईल तेव्हा आजपासूनच कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. गद्दार शिरोमणी मिंधे याने ४० आमदार फोडले. बैल पोळ्यात बैलावर लिहिलं होतं ५० खोके एकदम ओके. आता खासदारांचा किती भाव असेल. हा धंदा झाला. निवडून यायचं आणि हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं, असंही ते म्हणाले.
सध्या देशभरात अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिरातील दानचोरीचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणावर बोलताना ठाकरे म्हणाले, आपलं हिंदुत्व माणुसकी लुटणारं आहे. मंदीर लुटणारं नाही. हिंदुंना जागृती आली पाहिजे. आजचा सामनातील अग्रलेख वाचा. मध्ये मध्ये मोर्चा काढणारे झोपले आहेत का? सकल हिंदू समाजवाले कुठे आहेत? भाजपमुक्त राम पाहिजे. आम्ही त्यासाठी आंदोलन करणार आहोत, अशी घोषणा ठाकरे यांनी केली.