पुणे : राज्याच्या आरोग्य विभागाकडून क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्या तरी गेल्या तीन वर्षांत राज्यात दरवर्षी सरासरी सुमारे २ लाख क्षयरुग्ण आढळून आले आहेत. विशेषतः शहरी भागांमध्ये रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असून पुणे शहर आघाडीवर आहे. त्यानंतर ठाणे आणि नागपूर महापालिकांचा क्रम लागतो.
गेल्या तीन वर्षांपासून राज्यात राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत बाधित रुग्णांना ‘डॉट्स’ प्रणालीद्वारे वजनानुसार मोफत औषधे दिली जात आहेत. तसेच ४२ जिल्हास्तरीय क्षयरोग प्रतिरोधक केंद्रे, निक्षय पोषण योजना आणि निक्षय मित्र यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी सुरू आहे.
तरीही अपेक्षित घट न झाल्याने राज्य शासनाने आता या मोहिमेला गती देण्यासाठी आशा सेविकांचे स्वतंत्र प्रशिक्षण सुरू केले आहे. सुमारे ८६ हजार आशा सेविकांना या प्रशिक्षणात सहभागी करून घेतले जात आहे. यात आजाराविषयी समाजमाध्यमांद्वारे जनजागृती करणे, रुग्णांचे समुपदेशन करणे, त्यांना तपासणी केंद्रांपर्यंत नेणे तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा करावा याचे मार्गदर्शन दिले जात आहे.