मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबईतील दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मला आनंद आहे की, शेवटी उद्धवजींना राम आठवले. आमची अपेक्षा एवढीच होती की त्यांना राम आठवले पाहिजे. त्यांनी रामाचा मार्ग सोडला होता म्हणूनच त्यांच्या पक्षाची अधोगती झाली. राम मार्गाने चालले तर त्यांचे भलं होईल. केवळ आजच्या पुरतेच नाही तर त्यांनी रोज रामरक्षा म्हणावी. मुख्यमंत्री फडणवीस आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. तेथे माध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीत झालेली कथित चोरी आणि निधीच्या अपहाराचा निषेध करण्यासाठी आज (रविवारी) येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते, पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अगोदर पक्षाला जागे करा, स्वतः जागे व्हा – संजय शिरसाट
शिवसेना नेते, प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “राजकारणासाठी पैसा वापरला जातो असं बोलणं बालिशपणा आहे. पूर्वी राणा दाम्पत्यांने हनुमान चालीसा वाचली म्हणून अटक केली, आता हनुमान चालीसा वाचणार, या निमित्ताने तुम्हाला हनुमान चालीसा वाचायला मिळतेय. तुमच्या राजकारणासाठी आता हिंदूची गरज आहे. तुमच्या मिरवणुकीत नाचणारा मुसा, हे सगळं बेगडी प्रेम आहे. हिंदुंचा नारा देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घ्या. ज्या पक्षाला सोबत घेतले, त्यांना तुमचे हिंदुत्व मान्य आहे का विचारा. सगळ्याच चुकांचा पश्चाताप करण्यासाठी दादरला जाऊन हनुमान चालिसा वाचावी आणि हनुमानाकडे चुकले म्हणून माफी मागा, अशी उपरोधिक टीका संजय शिरसाट यांनी केली.