मुंबई : हिंदू भीतीग्रस्त होता, कोणालाही हिंमत होत नव्हती की मी हिंदू आहे म्हणायची, तेव्हा शिवसेनाप्रमुख गरजले होते की, गर्व से कहो हम हिंदू है.. ते हिंदुत्व मला पुन्हा सुरू करायचं. हा हिंदू वेडा नाही. पावसात चिंब भिजूनही ते रामरक्षा म्हणत आहेत. ही पावसात पेटलेली ठिणगी आहे. रामभक्त कसे आहेत हे राज्यकर्त्यांना कळंल नसेल तर मी आठवण करून देतो की, प्रभू श्रीरामांबरोबर जी वानरसेना होती, त्यांनी रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. आमचा पक्ष चोरला, आमच्याकडचं प्रभू रामाचं धनुष्यबाण चोरलं. पण आज आमच्या हातात हनुमानाने ज्या मशालीने लंका जाळली होती, ती मशाल आहे. तुमच्या अन्यायाची लंका खाक केल्याशिवाय राहणार नाही. तथाकथित भोंदू आहेत, हे आपल्यावर टीका करत आहेत, त्यांना सांगू इच्छितो की तुमच्या धमन्यांमध्ये हिंदूंचं रक्त असेल, तर आमच्याबरोबर रामरक्षा करण्याकरता या”, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसंच, आम्हाला भाजपामुक्त राम पाहिजे. राम सर्वांचा आहे, असंही ते म्हणाले.

अयोध्येच्या राम मंदिरात देणगी चोरीचे प्रकरण समोर आले. या प्रकणी शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी ‘राम रक्षा’ आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याची सुरुवात आज, रविवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दादरच्या हनुमान मंदिरात रामरक्षा महाआरती करण्यात आली. यावेळी खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांसह प्रमुख पदाधिकारी, नेते, शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस सुरू असल्याने आंदोलनात जनसागर उसळेल की नाही याबाबत शाश्वती नव्हती. मात्र, भरपावसातही छत्र्या अन् रेनकोट घेऊन उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी आज उपस्थिती लावली. महत्त्वाचं म्हणजे भगवा सदरा घालून उद्धव ठाकरेंनीही भरपावसात आज जनतेशी संवाद साधला.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू, माता आणि भगिनींनो… याच एका वाक्याने बाळासाहेब ठाकरेंनी देशातील तमाम हिंदूंना जागं केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटलं होतं. आजही तोच क्षण आपल्या डोळ्यांसमोर आहे. आपण कट्टर, कडवट आणि देशाभिमानी हिंदू आहोत. आपण हिंदू भोळे, भाबडे आहोत. पण मूर्ख नाही आहोत. आपल्या हिंदुत्त्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललो आहे की अब हिंदू माफ नही करेगा”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली.
ठाकरे पुढे म्हणाले की, राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडलं आहे. आम्ही भोळे, भाबडे हिंदू आहोत, पण मूर्ख नाही. कुणी मंदिर लुटत असेल तर हिंदू कधीही माफ करणार नाही. तसेच राम मंदिराला केलेलं सगळं दान कुठे गेलं असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हिंदुंचे पैसे लुटता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्हाला भाजपमुक्त राम हवाय. त्यामुळे आता राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरा. शिवसेनेने राम मंदिराला दिलेली चांदीची वीट कुठे गेली? राम रक्षा आंदोलन म्हणजे भर पावसात पेटलेली ठिणगी आहे. शिवसेना संपवण्याचा अफजलखानी विडा त्यांनी उचललाय. त्यामुळे या आंदोलनासाठी सर्वांनी आता एकत्र या, जोपर्यंत या चोरीचा निष्पक्षपातीपणाने निकाल लागला जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. अशी मोठी घोषणा देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यामुळे आता भविष्यात हे आंदोलन अधिक तापण्याची शक्यता आहे. दरम्यान आता जी जाग आली आहे, ती जाग तशीच ठेवा, झोपू नका, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भर पावसामध्ये हे आंदोलन आज मुंबईमध्ये पार पडलं आहे. या आंदोलनाला ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.